मुंबई – राज्यातील महिला अत्याचारांच्या घटनांवरून विरोधीपक्ष भाजपने सत्ताधारी महाविकास आघाडीला धारेवर धरले आहे. अशातच भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात महिलेचा विनयभंग झाल्याची घटना समोर आल्याने महिला अत्याचाराच्या घटनांवरून गळे काढणाऱ्या भाजप नेत्यांचा हेतू केवळ राजकीय असल्याची टीका महाविकास आघाडीतील नेत्यांनी केली आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी या घटनेची गंभीर दखल घेतानाच भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला आहे.
भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात झालेल्या कथित विनयभंगाच्या घटनेवरून पेडणेकर यांनी, “भाजपच्या महिला आता गप्प का? दिव्याखाली अंधार आहे. भाजप नेहमीच महाराष्ट्राला बदमान करण्याचा प्रयत्नात असते. खोटं रडून दाखवता. भाजपशासित राज्यात महिला अत्याचाराच्या घटना खूप घडत आहेत. आता ताईंगिरी कुठे गेली, फोन बंद का,” असे रोखठोक सवाल उपस्थित केले आहेत.
नेमकं काय आहे प्रकरण?
भाजप नगरसेविका अंजली खेडेकर यांच्या कार्यालयात एका कार्यकर्त्याने महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. त्याची तक्रार आमदार आणि खासदार यांच्याकडे केली म्हणून नगरसेविका आणि सहकाऱ्यांनी मारहाण केल्याचा आरोप पीडित समाजसेविकेने केला आहे.
या विरोधात महिनाभरापूर्वी तक्रार करूनही गुन्हा दाखल झाला नाही. अखेर गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्याकडे दाद मागितल्यावर बोरीवली पोलिसांनी एफआयआर दाखल केल्याचा आरोप पीडितेने केला आहे.
मी असते तर थोबाड फोडून टाकले असते – पेडणेकरांची संतप्त प्रतिक्रिया
याबाबत बोलताना किशोरी पेडणेकर यांनी, आपण स्वत: बोरिवली प्रकरणात लक्ष घालणार आहे. पोलिस स्टेशनला जाणार आहे, असे सांगितले. ‘तसेच, केवळ महाराष्ट्र बदनाम करण्याचे काम भाजपकडून होत आहे. भाजपच्या ताई पब्लिक स्टंटसाठी पुढे येणार आणि आता गप्प बसणार? महिलांच्या विषयावर धाय मोकलून रडणाऱ्या भाजपच्या ताईंचा फोन सकाळपासूनच स्वीच ऑफ आहे, त्यांच्या पक्षातील कुणीच याबाबत बोलायला तयार नाही. कोणत्याही पक्षाची महिला असो, अन्याय होत असेल तर भूमिका घेतली पाहिजे, मी असते तर थोबाड फोडून टाकले असते,’ अशी संतप्त प्रतिक्रिया महापौर पेडणेकर यांनी दिली.