संयुक्तराष्ट्रे: संयुक्तराष्ट्रांच्या सुरक्षा मंडळात काश्मीर मधील सध्याच्या स्थितीवर चर्चा व्हावी अशी मागणी करणारा प्रस्ताव चीनने दिला होता पण त्यांनी आज तो मागे घेतला आहे. संयुक्तराष्ट्रांच्या सुरक्षामंडळात काश्मीर मधील सध्याच्या स्थिती बाबत चर्चा करावी यासाठी पाकिस्तान आग्रही आहे. त्यांनी तसा प्रस्ताव 12 डिसेंबर रोजी सुरक्षा मंडळत सादर केला आहे. पण चीनने त्यातून माघार घेतल्याने मंगळवारच्या सुरक्षा मंडळाच्या बैठकीत हा विषय चर्चेला येऊ शकला नाही. चीनने हा प्रस्ताव का मागे घेतला याचे कारण मात्र दिले नाही. त्याविषयी मी जादा काही सांगू शकत नाही असे चीनच्या येथील दूताने पत्रकारांना सांगितले.
अमेरिका आणि चीन या देशांनी काश्मीरच्या विषयावर सुरक्षा मंडळात चर्चा करायची नाहीं असा निर्णय घेतल्याने हा विषय बारगळला आहे. या आधी फ्रांसनेही या विषयावर चर्चा करण्यास विरोध दर्शवला होता. काश्मीरचा विषय भारत आणि पाकिस्तान या दोन देशांशी संबंधीत असून या दोन देशांनी आपसातच यावर चर्चा करून त्यावर तोडगा काढावा अशी भूमिका फ्रांसने या आधी अनेक वेळा मांडली आहे. त्याच भूमिकेतून आम्ही सुरक्षा मंडळात यावर चर्चा उपस्थित करण्यास नकार दिला आहे असे फ्रांसच्या प्रतिनिधींनी यावेळी स्पष्ट केले.
भारताने कलम 370 रद्द केले आणि काश्मीर राज्याचे विभाजन केले आहे. याला स्थानिक काश्मीरींनी तीव्र विरोध केला आहे. त्यामुळे त्यांच्या हक्कांच्या रक्षणासाठी सुरक्षा मंडळाने यावर चर्चा करावी अशी मागणी पाकिस्तानकडून सातत्याने लाऊन धरण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच सुरक्षा मंडळात बंद दाराआड काश्मीर विषयावर 16 ऑगस्ट रोजी चर्चा करण्यात आली होती. पण त्यावेळी या संबंधात सुरक्षा मंडळाने कोणताही निर्णय घेतला नव्हता. चीनच्या मदतीने काश्मीर प्रश्नाचे आंतरराष्ट्रीयकरण करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न होता. पण सुरक्षा मंडळातील अनेक सदस्य देशांनी त्याला विरोध दर्शवल्यानंतर आता चीननेही आपले अंग यातून काढून घेतल्याने पाकिस्तानच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.