नवी दिल्ली : युक्रेन संकटाचा संदर्भ देत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारला इशारा दिला आहे. दिल्लीत ते शरद यादव यांना भेटण्यासाठी आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत, चीनही रशियासारखे कृत्य करू शकतो, असा इशारा दिला.
चीनने भारताचा पॉवर ग्रीड प्रकल्प हॅक करण्याचा प्रयत्न केल्याची कबुली खुद्द सरकारनेच दिली आहे. गेल्या चार महिन्यांत चीनने 3 वेळा प्रयत्न केले. या संदर्भात राहुल यांना विचारला असता ते म्हणाले की, चीनच्या मुद्द्यावर विरोधक संसदेत चर्चा करू पाहतात. मात्र सरकार चर्चा होऊ देत नाही.
युक्रेन-रशिया युद्धाचा संदर्भ देत राहुल म्हणाले की, रशिया म्हणतो की आम्ही डॉनबास आणि लुगांस्क प्रदेशाला युक्रेन मानत नाही. त्या आधारावर रशियाने युक्रेनवर आक्रमण केले. नाटो, युक्रेन आणि अमेरिका यांच्यातील युती तोडणे हे या हल्ल्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. तोच नियम चीन भारताला लागू करत असल्याचे राहुल गांधी म्हणाले.
रशियाने जसे डॉनबास आणि लुगांस्क युक्रेनचे नाही असे म्हटले, तसेच लडाख आणि अरुणाचल प्रदेश भारताचे नाहीत, असं चीन म्हणत आहे. त्यांनी आपले सैन्य उभे केले आहे. सरकार त्याकडे दुर्लक्ष करत असून सत्य स्वीकारत नाही. तुम्ही सत्य स्वीकारून तयारी केली नाही, तर जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाईल, तेव्हा प्रतिक्रिया देऊन उपयोग होणार नाही, असा इशाराही राहुल यांनी दिला.
राहुल गांधी यांनी महागाईवरून सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, ज्या देशात शांतता आणि सौहार्द नाही, त्या देशात महागाई वाढते. अर्थव्यवस्था चालत नाही आणि रोजगारही मिळत नाही. देश मजबूत करायचा असेल तर सर्वात मोठी गोष्ट म्हणजे शांतता आणि सामाजिक सलोखा आवश्यक आहे. मात्र द्वेष पसरवून, लोकांना धमकावून, लोकांना मारून भारताची अर्थव्यवस्था मजबूत होऊ शकते, असं भाजपच्या लोकांना वाटतं, तो त्यांचा गैरसमज आहे.
सत्यापासून कोणीही सुटू शकत नाही, असं राहुल म्हणाले. आधुनिक राजकारणात मीडियाच्या मदतीने वास्तवापासून तात्पुरते सुटण्याचा मार्ग आहे. तुम्ही 6 महिने, एक वर्ष, दोन वर्षे माध्यमांद्वारे सत्य दाबू शकता…. पण जेव्हा ते सत्य तरुणांच्या पोटापर्यंत पोचते, त्यांच्या आई-वडिलांच्या पोटापर्यंत पोहोचते, तेव्हा मीडियाला ते सांभाळता येत नाही.
गेली २-३ वर्षे संस्था, मीडिया, भाजप आणि आरएसएस यांच्या माध्यमातून सत्य लपवून ठेवण्यात येत आहे. आता हळूहळू सत्य बाहेर येईल. श्रीलंकेतही तेच घडले आहे. तेथे सत्य समोर आले आहे. तसेच सत्य भारतातही समोर येईल. भारताला विभागण्यात आलं आहे. दोन वेगवेगळे गट तयार करण्यात आले आहेत. त्यांना एकमेकांशी लढवण्यात येत आहे. तुम्ही भलेही माझ्यावर विश्वास ठेवू नका, दोन ते तीन वर्षे थांबा, तुमच्या सर्वकाही लक्षात येईल, असा इशाराही राहुल यांनी दिला.