चेन्नई – तामिळनाडूमधील रामनाथपुरम येथील मच्छिमारांना श्रीलंकेच्या न्यायालयाने निश्चित केलेल्या जामीन रकमेमुळे धक्का बसला आहे. न्यायालयाने प्रत्येक भारतीय मच्छिमाराच्या सुटकेसाठी 2 कोटी रुपयांची जामीन रक्कम निश्चित केली आहे. ऑल मेकॅनाइज्ड बोट असोसिएशनच्या एका वरिष्ठ सदस्याने ही माहिती दिली आहे. श्रीलंकेच्या नौदलाने 23 मार्च रोजी 13 भारतीय मच्छिमारांना त्यांच्या जल सीमेत मासेमारीसाठी अटक केली होती.
ऑल मेकॅनाइज्ड बोट असोसिएशनचे अध्यक्ष पी. जेसूराज म्हणाले, “न्यायालयाने प्रत्येक मच्छिमारासाठी 2 कोटी रुपयांची रक्कम निश्चित केली आहे हे ऐकून आम्हाला आश्चर्य वाटले. मच्छिमार दोन कोटींची व्यवस्था कुठून करणार? त्यांच्याकडे एवढी मोठी रक्कम असती तर ते या व्यवसायात का आले असते? जेसुराजच्या म्हणण्यानुसार, 85 भारतीय बोटी अजूनही श्रीलंकेच्या ताब्यात आहेत.
या प्रकरणावर, भारतीय परराष्ट्र मंत्रालय आणि मत्स्यव्यवसाय मंत्रालय यांच्यात श्रीलंका सरकारसोबत ‘टू प्लस टू’ स्तरावर संवाद यंत्रणा तयार करण्यात आली आहे. याशिवाय दोन्ही देशांदरम्यान एक संयुक्त कार्यगटही आहे. भारत सरकार मच्छिमारांना राजनैतिक, कायदेशीर आणि इतर मदत पुरवते.
गेल्या महिन्यात भारत सरकारने सांगितले की, श्रीलंकेच्या नौदलाने तामिळनाडूच्या मच्छिमारांना ताब्यात घेण्याचा मुद्दा शेजारील देशासोबत सर्वोच्च पातळीवर उचलला आहे. या मुद्द्यावर दोन्ही देशांदरम्यान संयुक्त कार्यगटाची बैठकही झाली.
लोकसभेतही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. खासदारांनी सांगितले होते की, श्रीलंकन नौदल तामिळनाडूच्या मच्छिमारांना सागरी क्षेत्रात त्रास देत आहे आणि अनेक मच्छिमारांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या बोटी जप्त केल्या आहेत. परराष्ट्र राज्यमंत्री या विषयावर म्हणाले की, भारत सरकार आपल्या नागरिकांच्या हिताची पूर्ण काळजी घेते, मग तो विद्यार्थी, कामगार किंवा कोणताही भारतीय नागरिक असो. भारतीय मच्छिमारांचा प्रश्न सर्वोच्च स्तरावर श्रीलंका सरकारकडे मांडण्यात आला आहे. यामुळे मोठ्या संख्येने मच्छिमारांची सुटका करण्यात आली असून ते मायदेशी परतले. श्रीलंकेच्या ताब्यात असलेल्या मच्छिमारांची सुटका करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहितीही मुरलीधरन यांनी दिली होती. ते म्हणाले की, आमच्यासाठी ही बाब गंभीर चिंतेची आणि अत्यंत महत्त्वाची आहे.
दरम्यान, श्रीलंकेवर आर्थिक संकट ओढावले आहे. येथे महागाई गगनाला भिडली आहे. देशभरात वीजपुरवठा खंडित झाला आहे. विजेअभावी रुग्णांच्या आवश्यक शस्त्रक्रियाही रुग्णालयात होत नाहीत, कारखाने बंद, पेपर कमी असल्याने परीक्षा रद्द, रेल्वे-बसची वाहतूक ठप्प झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. तेलाचा अभाव.. पुरवठा साखळी पूर्णपणे कोलमडली आहे, घरातील चुल बंद झाल्या आहेत आणि खाण्यापिण्याच्या तुटवड्यामुळे दुकानांमध्ये लूट सुरू झाली आहे.