नवी दिल्ली – पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ झालेल्या संघर्षानंतर भारत-चीनमधील तणाव काही दिवसांपासून चिघळलेला आहे. एकूणच या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत चीनला लागून असलेल्या सीमाभागांमध्ये आणखी 35 हजार जवान तैनात करण्याची तयारी करत आहे, असे एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, भारत-चीन सीमा रेषावर काही दिवसांपासून तणावग्रस्त वातावरण आहे. दोन्ही देशांच्या सैन्य वरिष्ठांच्या अनेक चर्चा झाल्या मात्र बहुतेक ठिकाणांहून चीनने जवानांना मागे हटविल्याचा दावा केला असला तरी तो खोटा असल्याचे सांगितले जात असून चीनने सैनिकांना हटवले नसल्याचे भारताचे स्पष्ट केले आहे.
भारताची 3,488 किलोमीटरची सीमारेषा चीनला लागून आहे. 15 जूनच्या रात्री गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाले, तर चीनचे 40 पेक्षा जास्त सैनिक ठार झाले. त्यानंतर पूर्व लडाखमध्ये दोन्ही देशांनी आपले हजारो सैनिक, रणगाडे, तोफा, फायटर विमाने तैनात केली.
सध्या दोन्ही बाजूंमध्ये चालणाऱ्या चकमकी थांबल्या आहेत. दोन्ही देशांच्या वरिष्ठ सैन्य अधिकाऱ्यांमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या आहेत. आता दोन्ही बाजू पाचव्या फेरीच्या चर्चेची तयारी करत आहे.
दरम्यान, पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेकडे बघण्याचा दृष्टीकोन आता कायमचा बदलून गेला आहे, असे दिल्ली स्थित थिंक टॅंकचे संचालक आणि निवृत्त मेजर जनरल बी. के. शर्मा म्हणाले. सर्वोच्च राजकीय स्तरावर तोडगा निघत नाही, तो पर्यंत दोन्ही बाजू माघार घेणार नाहीत, असे शर्मा म्हणाले.