नवी दिल्ली: 15 जून रोजी पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यामध्ये चिनी सैन्याबरोबरच्या संघर्षात शहीद झालेल्या भारतीय सैन्यातील 20 जवानांची नावे राष्ट्रीय युद्धस्मारकावर कोरली जातील, असे अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले. स्मारकावर या वीरांची नावे कोरण्याच्या कामाला काही महिने लागू शकतात, असेही या अधिकाऱ्यांनी सांगितले.
पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात 15 जून रोजी भारतीय लष्करातील जवान आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षामध्ये हे 20 जवान शहीद झाले होते. गेल्या 5 दशकांमध्ये प्रथमच दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये इतका भयंकर संघर्ष झाला होता. या संघर्षात भारतीय सैन्य दलातील शहीद झालेल्यांमध्ये 16 बिहार रेजिमेंटचे कमांडिंग ऑफिसर कर्नल बी संतोष बाबू यांचाही समावेश होता.
या घटनेमुळे सीमेवरील तणाव वाढला होता. चिनी सैनिकांनी केलेला हा हल्ला पूर्वनियोजित आणि हेतूपुरस्सरपणे करण्यात आला होता, असे भारताने म्हटले आहे.
गलवान खोऱ्यात पेट्रोलिंग पॉईंट 14 जवळ चिनी सैनिकांनी उभारलेली चौकी हटवण्यासाठी गेलेल्या भारतीय जवानांवर
चिनी सैनिकांनी लोखंडी बार, काठ्या आणि विटांच्या सहाय्याने हल्ला चढवला होता. या संघर्षाच्यावेळी झालेल्या चीनच्या बाजूच्या हानीचा तपशील चीनने उघड केलेला नाही. मात्र, या हल्ल्यात चीनचे 35 सैनिक मारले गेले असल्याची माहिती अमेरिकेच्या गुप्तचर अहवालामध्ये देण्यात आली आहे.
चिनी सैनिकांबरोबरच्या 15 जूनला झालेल्या आणि मे महिन्यात पान्गोंग त्सो येथील संघर्षाच्यावेळी अतुलनीय शौर्य गाजवलेल्या 5 जवानांना लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी “कमेंडशन कार्डस’ने सन्मानित केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही या जवानांच्या शौर्याचे कौतुक केले आहे.