मुंबई : पावसाळी अधिवेशनाला जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात होणार आहे. मागील अधिवेशनापासून प्रलंबित असलेल्या विधानसभा अध्यक्षपदाबाबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्य सरकारला पत्र पाठवले होते. आता या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले आहे.
विधानसभा अध्यक्ष नेमणुकीबाबत काल मर्यादा निश्चित नाही. नरहरी जिरवळ कामकाज सांभाळत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी पत्रात म्हटले आहे. तसेच ओबीसी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निर्णय निवडणूक आयोगाने घेतला. केंद्राला आम्ही विनंती केली डेटा द्यावा आपणही पतपुरवठा करावे, असे मुख्यमंत्र्यांनी पत्रात लिहिले आहे.
पुढे मुख्यमंत्र्यांनी लिहिले की, सद्य:स्थितीत नरहरी झिरवळ यांना महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदाचा कार्यभार सोपविण्यात आलेला आहे. तसेच त्यांच्या अध्यक्षपदाखाली नुकतेच अर्थसंकल्पीय अधिवेशनाही पार पडले आहे. त्यामुळे सदर निवडणुकीअभावी कोणत्याही सांविधानिक तरतूदीचा भंग झालेला नाही अथवा घटनात्मक अडचण निर्माण झालेली नाही.
विधानसभेच्या अध्यक्षांच्या निवडीमध्ये शक्यतो प्रत्येक विधानसभा सदस्याला प्रत्यक्ष भाग घेता येईल, अशा पध्दतीने ही निवडणूक घेणे योग्य होईल याबाबत दुमत असण्याचे कारण नाही. ही निवडणूक लवकरात लवकर व्हावी अशी सरकारचीही इच्छा आणि तसा प्रयत्नही आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
ओबीसी आरक्षणाचा मुद्दा ही मुख्यमंत्र्यांनी पत्रात मांडला आहे. या संवेदनशील प्रश्नाचे महत्त्व पाहता मी आपणांसही विनंती करु इच्छितो की, आपणही आपल्या स्तरावर केंद्र शासनाकडे पाठपुरावा करुन इतर मागास प्रवर्गाच्या 2011 मधील जनगणनेमधील इम्पिरीकल डेटा मिळवून द्यावा, जेणेकरुन पुढील आवश्यक पाऊले उचलणे राज्य शासनास शक्य होईल.
आपणाकडून या संदर्भात सहकार्य केले जाईल अशी मला खात्री असून आपल्या सहकार्याबद्दल मी आपला आभारी राहीन, असंही मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.