मुंबई – पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड मतदारसंघातील पोटनिवडणुका बिनविरोध व्हाव्यात यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विधान सभा विरोधी पक्ष नेते अजित पवार, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केली. तसेच, महाराष्ट्राची राजकीय परंपरा आणि संस्कृती जपण्यासाठी दोन्ही पोटनिवडणुका बिनविरोध करण्याची त्यांनी मागणी केली आहे.
एकनाथ शिंदे यांनी आज कल्याणमधील मलंग गडावरील उत्सवाला हजेरी लावली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. त्यावेळी त्यांनी पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी सर्वपक्षीयांना फोनवरून विनंती केल्याचे सांगितले.
शनिवारी मी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विनंती केली की, आपल्या या महाराष्ट्राची एक संस्कृती व परंपरा आहे. ज्या ठिकाणी आमदार सदस्यांचे दु:खद निधन होते. त्या पोटनिवडणुकीत आपण उमेदवार उभे करत नाहीत. ती निवडणूक बिनविरोध होते. अशाप्रकारे आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे, असे त्यांनी म्हणाले.
अंधेरी पोटनिवडणुकीवेळी राज ठाकरे आणि शरद पवार यांनी आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने दिला होता. त्यानंतर ही निवडणूक बिनविरोध झाली. विशेष म्हणजे या सगळ्यातून महाराष्ट्रातील जनतेला एक चांगला संदेश देता येऊ शकतो. परंतु, विनंती करण्याचा काम आमचे असून, निर्णय घेण्याचे काम त्यांचे आहे, असेही शिंदेंनी सांगितले.