मुंबई : कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी काल मतदान पार पडले. मतदानानंतर संभाजीराजे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना संभाजीराजे यांनी ३ मे नंतर आपली दिशा वेगळी असेल असे मोठे विधान केले आहे. ३ मे रोजी संभाजीराजेंची खासदारकीची मुदत संपत आहे. त्यामुळे ३ मे नंतर राजकीय दिशा स्पष्ट करणार असल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले आहे. संभाजीराजेंच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
मंगळवारी कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडले. त्यानंतर बोलताना त्यांनी ३ मे नंतर माझी राजकीय दिशा स्पष्ट करणार असून ती नक्की वेगळी असेल असे जाहीर केले आहे. त्यामुळे संभाजीराजे भाजपा, शिवसेना किंवा राष्ट्रवादीत प्रवेश करत नवा घरोबा करणार की आपला नवा पक्ष स्थापन करणार, याची चर्चा रंगली आहे.
खासदारकीचा कार्यकाळ संपल्यावर तुमची राजकीय भूमिका काय असेल? असे विचारले असता त्यांनी, “वेट अँड वॉच आहे…३ मे रोजी माझी मुदत संपत आहे. निश्चित वेगळी दिशा असणार यामध्ये काही दुमत नाही. पण काय दिशा असणार आहे त्यासाठी वाट पाहूयात. ३ मे नंतर आपण पुन्हा एकदा बोलू”.