चेन्नई – बुद्धिबळ खेळातील मानाची स्पर्धा असणारी बुद्धिबळ ऑलिम्पियाड 2022 यंदा भारतात खेळवली जात आहे. या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारताचा ग्रॅंडमास्टर रौनक साधवानीने यूएईच्या अब्दुल रेहमानला मात दिली आहे. या विजयासोबत रौनकने पहिली फेरी पार करत पुढील फेरीत प्रवेश केला आहे.
बुद्धिबळ ऑलिम्पियाड 2022 मागील दोनही वर्षे करोनाच्या महामारीमुळे ऑनलाईन पद्धतीने पार पडलेली होती. यंदा ही स्पर्धा यंदा ऑफलाईन चेन्नईत पार पडत आहे. बुद्धिबळमधील अव्वल दर्जाचे संघ रशिया आणि चीन या स्पर्धेत सहभागी होत नसल्याने भारताला अधिक विजय मिळवण्याची संधी आहे. यावेळी खुल्या आणि महिला गटात भारताचे अ, ब आणि क असे तीन संघ सामील झाले आहेत.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी, तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन व क्रीडामंत्री अनुराग ठाकूर या मान्यवरांच्या उपस्थित बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
याप्रसंगी नरेंद्र मोदी म्हणाले, बुद्धिबळ या खेळाला ज्या भूमीत सुरुवात झाली, तिथे प्रथमच ऑलिम्पियाड स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. भारतात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात असून त्याच वर्षी ऑलिम्पियाडचे यजमानपद भूषवणे, हे भारतासाठी खास यश असल्याचे त्यांनी सांगितले.
या उद्घाटन सोहळ्यात भारत आणि तमिळनाडूच्या संस्कृतीचे दर्शन घडवण्यात आले. तसेच भारताचा माजी विश्वविजेता बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदने ऑलिम्पियाड क्रीडाज्योत स्टॅलिन आणि मोदी यांच्याकडे सुपूर्द केली. त्यानंतर आर. प्रज्ञानंद, डी. गुकेश युवा ग्रॅंडमास्टरांसह भारताच्या पहिल्या महिला ग्रॅंडमास्टर एस. विजयालक्ष्मी यांनी ही क्रीडाज्योत हाती घेतली.
पाकिस्तानची माघार दुर्दैवी
तमिळनाडू येथे सुरू झालेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेतून माघार घेण्याच्या पाकिस्तानच्या निर्णयावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने टीका केली आहे. चेन्नईजवळील महाबलीपूरम येथे होत असलेल्या या स्पर्धेत खेळण्यासाठी पाकिस्तानचा संघ भारतात दाखल झाला होता. मात्र, त्यानंतर “राजकारण’मध्ये आणत पाकिस्तानने या प्रतिष्ठेच्या जागतिक स्पर्धेतून माघारी घेणे हे आश्चर्यकारक आणि दुर्दैवी असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी म्हटले आहे. ऑलिम्पियाडची क्रीडा ज्योत काश्मीरमध्येही नेण्यात आल्यामुळे पाकिस्तानने या स्पर्धेतून माघार घेतली.