चेन्नई – यजमान भारताच्या ‘क’ संघांना येथे सुरू असलेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत अपयश येत आहे. एकीकडे ‘अ’ संघाने फ्रान्सला 2-2 असे बरोबरीत रोखले. तर, दुसरीकडे भारताच्या ‘क’ संघांना पराभवाचा सामना करावा लागला.
भारताच्या सहाही संघांनी पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये या स्पर्धेवर वर्चस्व गाजवले होते. मात्र भारताच्या तीन संघांची चौथ्या फेरीत विजयाची मालिका संपुष्टात आली. भारत ‘अ’ संघाच्या पी. हरिकृष्णाला जुल्स मोसार्ड, विदित गुजराथीला लॉरेंट फ्रेसिनेट, अर्जुन इरिगेसीला मॅथेऊ कॉर्नेट आणि एस. एल. नारायणनला मॅक्सिम लग्रेडने बरोबरीत रोखले.
भारताच्या ‘क’ संघाला स्पेनकडून 1.5-2.5 असा पराभव स्वीकारावा लागला. सूर्यशेखर गांगुली, एस. पी. सेतुरामन तसेच मुरली कार्तिकेयन यांनी बरोबरीवर समाधान मानले. अभिजित गुप्ता या अव्वल खेळाडूलाही फ्रान्सच्या डेव्हिड अँटोनकडून 41 चालींमध्ये पराभव पत्करावा लागला. भारताच्या ‘ब’ संघाने मात्र डी. गुकेश आणि निहाल सरिन यांनी नोंदवलेल्या विजयांसह घौडदौड कायम राखली आहे.
रौनक साधवानी आणि आर. प्रज्ञानंद यांना मात्र बरोबरीवर समाधान मानावे लागले. महिला विभागातही भारताच्या ‘अ’ संघाने हंगेरीवर 2.5-1.5 असा विजय प्राप्त केला. कोनेरू हम्पी आणि द्रोणावल्ली हरिकासह आर. वैशालीचे सामने बरोबरीत सुटले. मात्र, तानिया सचदेवने अनुभव पणाला लावत 52 चालींमध्ये सोका गालचा पराभव केल्याने भारताच्या ‘अ’ संघाला सलग चौथ्या विजयाची नोंद करता आली.