मुंबई – डॉलर वधारत असल्यामुळे भारताकडील परकीय चलन साठा वेगाने कमी होत आहे. त्यासाठी भारत सरकार चालू खात्यावरील आणि व्यापारातील तूट कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र असे असूनही एप्रिल ते जून या कालावधीत भारतातील सोन्याची मागणी 43 टक्क्यांनी वाढून 170 टनावर गेली आहे.
आगामी काळात ही मागणी कमी करण्यासाठी भारत सरकार आणखी उपाययोजना करण्याची शक्यता विश्लेषकांनी व्यक्त केली. भारतातील आणि जगातील वाढलेली महागाई, डॉलरच्या तुलनेत रुपयाचा घसरत असलेला दर या कारणामुळे आगामी काळात सोन्याची मागणी काही प्रमाणात कमी होऊ शकते.
जागतिक सुवर्ण परिषदेने म्हटले आहे की, गेल्या वर्षी पहिल्या तिमाही भारतातील सोन्याची मागणी केवळ 119 टन इतकी होती. ती आता 170 टणावर गेली आहे. गेल्या वर्षी पहिल्या तिमाहीत करोनाचा प्रभाव होता. यावर्षी तो प्रभाव नसल्यामुळे सोन्याची मागणी वाढत असल्याचे जागतिक सुवर्ण परिषदेचे भारतातील मुख्य कार्यकारी अधिकारी सोमसुंदरम पी आर यांनी सांगितले.
प्राप्त माहितीनुसार या संपूर्ण वर्षात भारतातील सोन्याचे मागणी 800 टनापर्यंत वाढू शकते. मात्र दरम्यानच्या काळामध्ये जर नकारात्मक परिस्थिती निर्माण झाली आणि भारत सरकारने सोन्याच्या आयातीवर आणखी प्रतिबंध घातले तर ही मागणी त्यापेक्षा कमी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या वर्षी भारतामध्ये 797 टन सोन्याची आयात झाली होती. वर्षाच्या अखेरीस भारतामध्ये बरेच सण येतात. या काळात भारतामध्ये सोने खरेदी करण्याची परंपरा आहे. पाऊस चांगला पडल्यामुळे ग्रामीण भागातील लोकांचे उत्पन्न वाढल्यामुळे सोन्याची मागणी वाढू शकते.
मात्र मुळातच सोन्याचे आयात कमी करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करीत आहे. त्याचबरोबर भारतातील नागरिकांनी प्रत्यक्ष सोने खरेदी करण्याऐवजी सरकारने जारी केलेल्या सुवर्णरोखेच्या माध्यमातून सोने खरेदी करण्यासाठी सरकार अनेक वर्षापासून प्रयत्न करीत आहे. या प्रयत्नांना थोडाफार प्रतिसाद मिळू लागला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना सोन्यात खरेदी केल्याचा फायदा होतो मात्र प्रत्यक्ष सोने पाळण्याची गरज निर्माण होत नाही.