नवी दिल्ली :- भारताच्या आर्थिक प्रगतीमध्ये रासायनिक आणि पेट्रोकेमिकल उद्योग महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत आणि भविष्यातही ते विकासाचे प्रमुख चालक म्हणून काम करत राहतील अशी अपेक्षा आहे, असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण तसेच वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले.
ते नवी दिल्लीत आयोजित ‘भारत: जागतिक रसायने आणि पेट्रोकेमिकल्स उत्पादन हब्स’ (GCPMH 2023) या विषयावरील तिसऱ्या शिखर परिषदेत ‘ मुक्त व्यापार करार (FTAs) – कनेक्टिंग द वर्ल्ड- वसुधैव कुटुंबकम- एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ या सत्राला प्रमुख पाहुणे म्हणून संबोधित करत होते.
भारताची अर्थव्यवस्था, नवोन्मेष प्रणाली आणि रोजगार निर्मिती या क्षेत्रात रासायनिक आणि पेट्रोकेमिकल उद्योगाने दिलेल्या महत्वपूर्ण योगदानाची गोयल यांनी प्रशंसा केली.
मुक्त व्यापार करार (FTAs) निर्यात वाढविण्यात आणि एकत्रितपणे अनेक क्षेत्रांच्या वाढीस प्रोत्साहन देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्याचे गोयल म्हणाले. रसायने आणि पेट्रोकेमिकल्स उद्योगात व्यापार, गुंतवणूक आणि सहयोग सुलभ करण्याच्या मार्गांचा शोध घेण्यासाठी एक मंच म्हणून ही शिखर परिषद काम करत आहे, असेही ते म्हणाले.
या उद्योगातील नेते, धोरणकर्ते आणि तज्ञांना चर्चा करण्यासाठी तसेच या महत्त्वपूर्ण क्षेत्राची स्पर्धात्मकता आणि शाश्वतता वाढवण्यासाठी मुक्त व्यापार कराराचा लाभ कसा घेता येईल यावर विचार विनिमय करण्यासाठी या शिखर परिषदेने एक व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल गोयल यांनी संघटनेचे कौतुक केले.
भारतातील रासायनिक आणि पेट्रोकेमिकल उद्योगांमध्ये परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यात मुक्त व्यापार करार मदत करू शकतात असे ते म्हणाले. यामुळे नवीन रोजगार निर्माण होतील आणि नवीन पायाभूत सुविधांचा विकास होईल तसेच या उद्योगाची जगाशी संपर्क साधण्याची क्षमता आणखी बळकट होईल, हे गोयल यांनी अधोरेखित केले.