विधिषा देशपांडे
दिवाळी हा अज्ञानावर ज्ञानाचा आणि वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा केला जाणारा सण आहे. त्याचप्रमाणे तो स्वच्छता आणि समृद्धीचा संदेश देणाराही सण आहे. आज आपल्या देशात अस्वच्छता आणि गरिबी मोठ्या प्रमाणावर दिसून येते. स्वच्छतेसाठी सरकारने सुरू केलेल्या मोहिमेत सहभागी होण्याचा संकल्प करणे आणि गरिबी दूर करण्यासाठी आपल्या पातळीवर प्रयत्न करणे गरजेचे असून, देश स्वच्छ आणि समृद्ध होईल, तीच खरी दिवाळी असेल.
भारताच्या उत्सव परंपरेतील सर्वांत श्रेष्ठ सण म्हणजे दिवाळी होय. असत्यावर सत्याचा विजय, अधर्मावर धर्माचा विजय, अज्ञानाच्या अंधकाराला ज्ञानाच्या उजेडाने नाहिसा करण्याचा सण आणि वर्षा ऋतूनंतर येणाऱ्या शरद ऋतूचे स्वागत करण्याचा उत्सव म्हणून हा सण साजरा केला जातो. उजेडाच्या या उत्सवाचे आध्यात्मिक, धार्मिक आणि सामाजिक अशा तीनही बाबतीत मोठे महत्त्व आहे. वाईट विचारांवर सुविचारांचा, निराशेवर आशेचा आणि अंधारावर प्रकाशाचा विजय करण्याचे बळ दिवाळी देते. परंतु सध्याच्या स्थितीत हा उत्सव अधिक प्रासंगिक बनला आहे. “तमसो मां ज्योतिर्गमय’ या उक्तीनुसार व्यक्ती, समाज आणि देशाला अंधकाराकडून उजेडाकडे नेण्याची गरज अधिक गडद झाली आहे. हिंदू तत्त्वज्ञानात, योग, वेदांतात असे मानण्यात आले आहे की, शरीराच्या आणि मनाच्या पलीकडे काहीतरी आहे. ते शुद्ध, अनंत आणि शाश्वत आहे. आध्यात्मिकदृष्ट्या असलेल्या अंधकारातून वाट काढत आंतरिक प्रकाशापर्यंत जाण्यासाठी दिवाळीच्या माध्यमातून केला जाणारा प्रयत्न याच शुद्ध आणि अनंत तत्त्वाशी संबंधित आहे.
हिंदूंच्या प्राचीन परंपरांपैकी एक असलेला दिवाळीचा हा उत्सव बौद्ध, शीख आणि जैनधर्मीयही साजरा करतात. भगवान बुद्धांच्या कपिलवस्तूमधील आगमनाच्या आनंदात “आत्मदीपो भव’चा संदेश म्हणून बौद्धधर्मीय हा सण साजरा करतात. स्वतःच स्वतःचे दीपक बना, हा भगवान बुद्धांचा संदेश आहे. म्हणूनच आत्मप्रकाश हा दिवाळीचा अर्थ आहे. जैनधर्मीय हा सण महावीरांच्या मोक्षाचा दिवस म्हणून साजरा करतात. हिंदू धर्मातील प्रचलित कथेनुसार, वनवास आणि लंकाविजयानंतर प्रभू रामचंद्र अयोध्येत परतले, त्या आनंदाप्रीत्यर्थ प्रकाशपर्वाच्या रूपाने दीपावली साजरी केली जाते.
महाभारतातील कथेनुसार, 12 वर्षांचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास संपवून पांडव परतले, त्या आनंदाप्रीत्यर्थ काहीजण दिवाळी साजरी करतात. भगवान विष्णूंची पत्नी तसेच उत्सव, धन आणि समृद्धीची देवता असणाऱ्या लक्ष्मीचाही दीपोत्सवाशी संबंध आहे.
विष्णूंचे वैकुंठात पुनरागमन झाल्याचा दिवस म्हणून दिवाळी साजरी केली जाते. पहिल्या सहस्रकात लिहिलेल्या पद्मपुराणात आणि स्कंदपुराणात दिवाळीचा उल्लेख आढळतो. देशाच्या काही भागांमध्ये हिंदू बांधव दिवाळीचा संबंध यम आणि नचिकेता यांच्या कथेशीही जोडतात. नचिकेताची कहाणी ज्ञान विरुद्ध अज्ञान, योग्य विरुद्ध अयोग्य, शाश्वत संपत्ती आणि अल्पजीवी संपत्ती आदी विषयांचे ज्ञान देणारी आहे. म्हणजेच, समाजात व्यापलेल्या अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञान आणि विवेकाचा प्रकाश उजळविण्याचा सण म्हणूनच दिवाळीकडे पाहिले जाते.
दिवाळी प्रकाशाबरोबरच स्वच्छतेचाही उत्सव असल्यामुळे आजच्या संदर्भात या पैलूवर विशेष प्रकाश टाकण्याची गरज आहे. भारतात सार्वजनिक ठिकाणांवर अत्यंत अस्वच्छता दिसून येते. त्यामुळेच सरकारच्या स्वच्छता मोहिमेच्या यशस्वितेसाठी प्रत्येक भारतीयाने त्यात सहभागी होण्याचा संकल्प दिवाळीच्या निमित्ताने केला पाहिजे. भारतात प्रदूषणाची समस्याही प्रचंड प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे पर्यावरणाच्या रक्षणासाठीही आपण एकजूट व्हायला हवे. प्रदूषणकारी फटाके आणि अन्य सामग्रीचा वापर कटाक्षाने टाळला पाहिजे.
आज आपल्या समाजात अंधश्रद्धा, कर्मकांड, कूपमंडुक वृत्ती, ईर्ष्या, घृणा, असत्य असे अनेक प्रकारचे अंधकार पसरताना दिसतात. अशा प्रवृत्ती आपल्या आयुष्यातून हद्दपार करण्याचे पर्व म्हणून आपण दिवाळी साजरी केली पाहिजे. देशातील राजकारणालाही आज नवविचार, सद्भावना आणि प्रेमाच्या प्रकाशाची गरज आहे. आध्यात्मिक ज्ञानाच्या बाबतीत भारत नेहमीच जगात अग्रेसर राहिला आहे. आज तांत्रिक ज्ञान आत्मसात करण्याची गरज आहे. अशा ज्ञानाचा उजेड आपण प्रत्येकाने आपल्या जीवनात निर्माण केला पाहिजे.
भारतात आजही मोठ्या प्रमाणावर गरिबी दिसून येते. गोरगरिबांच्या जीवनात सुख, समृद्धी आणण्यासाठी आपण प्रयत्न करण्याची गरज आहे. देशातील सर्व नागरिक जेव्हा समृद्ध, संपन्न होतील तेव्हाच दीपावलीचा आनंद खऱ्या अर्थाने साजरा करता येईल. या दिवाळीला आपण देश स्वच्छ आणि समृद्ध बनविण्याचा संकल्प करू या.