अरुण गोखले
“आपला’ या एका शब्दातच खूप मोठी जादू आहे. त्या आपलेपणात मोठी ताकद सामावलेली आहे. आपलं म्हटलं की त्यामुळे नकळत एखादी व्यक्ती, वस्तू, वास्तू इतकेच नाही तर एखादी रूढी किंवा परंपरासुद्धा आपलीशी वाटू लागते. मग इतर चारचौघांसारखी असली तरी आपण त्यामधले वेगळेपण शोधू लागतो.
अशा चिकित्सक शोधामधूनच मग आपल्याला ती रूढी आपल्या भावभावनांशी फार जवळ जाते, असे वाटते. तसे अनुभव गोळा होतात. त्यातलं वेगळेपण मनाला, विचारांना, भावनेला भावते. तेव्हा नकळतच त्याबद्दल आपलेपण निर्माण होते. आपण साजरा करत असलेल्या चातुर्मास संबंधातही थोडसं असंच काहीसं आहे. प्रत्येक वर्षी ज्याप्रमाणे उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू येतात. त्याप्रमाणेच मराठी महिन्यात म्हणजेच चैत्र ते फाल्गुन ह्या बारा मराठी महिन्यात जो एक विशिष्ट असा चार महिन्यांचा कालावधी येतो, त्यालाच आपण “चातुर्मास’ असे म्हणतो.
चातुर्मास म्हणजे काय, तर काही विशिष्ट बंधने पाळत, मानवी जीवन सौख्यासाठी आवश्यक असणाऱ्या विविध उपासना आणि व्रतवैकल्ये करण्याचा काळ. ईश्वरी कृपाशीर्वाद अन् पुण्य पदरी जोडत जाण्याचा एक ठरवून दिलेला विशिष्ट असा काळ. खरं म्हणजे वेगवेगळ्या धर्माने आपापल्या धर्माच्या लोकांना अशा प्रकारचा काळ नेमून दिलेला आहे.
फक्त त्याचा कालावधी हा कमी-जास्त असतो इतकेच. पण त्यामागचे शरीर आणि मानसिक स्वास्थ्य, मानसिक बलसंवर्धन, धर्माबद्दलची एकनिष्ठता, ह्या काही गोष्टी सगळ्याच धर्मात मूलभूत मानलेल्या आहेत, हे विसरून चालणार नाही. हिंदू धर्मीयांचा हा कालावधी चार महिन्यांचा ठरविलेला आहे. आपल्या प्रमाणेच इस्लाम धर्मातील कटाक्षाने पाळला जाणारा रोजा हा एक महिन्याचा कालावधी हा त्यांचा उपासनेचा काळ ठरलेला आहे. तसेच ख्रिश्चन समाजातही वर्षाकाठी काही विशिष्ट दिवसांचा काळ हा नेमून दिलेला आहे तो ह्याचसाठी.
आपल्या चातुर्मासाचा प्रारंभ हा आषाढ शुद्ध एकादशीपासून होतो. पंचांगात या एकादशीचे नाव “शयनी एकादशी’ असे दिलेले आहे. त्याचाच दुसरा एक अर्थ असा की, या दिवसापासून भगवान विष्णू हे शयन करतात. त्याची रात्र चालू होते. या संदर्भातली एक कथा आपल्याला एकादशी माहात्म्यात वाचायला मिळते. आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन आणि कार्तिक हा चातुर्मासाचा काळ. चातुर्मासाचा शेवट कार्तिक शुद्ध एकादशीला म्हणजेच प्रबोधिनी एकादशीला होतो. आपल्या चातुर्मासाच्या कालावधीत प्रामुख्याने येणारे सण, उत्सव हे खालीलप्रमाणे-
आषाढ- एकादशी, गुरूपौर्णिमा आणि दिव्याची अवस.
श्रावण- नागपंचमी, कृष्ण जन्माष्टमी, नारळी पौर्णिमा/रक्षाबंधन.
भाद्रपद- श्री गणेश उत्सव आणि पितृपक्ष.
अश्विन- देवी नवरात्र उपासना, दसरा आणि नरकचतुर्दशी व लक्ष्मीपूजन
कार्तिक- बलिप्रतिपदा अर्थात पाडवा, भाऊबीज, कार्तिकी एकादशी.