धरण 100 टक्के भरल्याने जलपूजन
राजगुरूनगर(प्रतिनिधी) – खेड तालुक्यातील चासकमान धरणाची उंची वाढविण्याबरोबर चास कमान धरणातील पाणी खेड तालुक्यातील नागरिकांना हक्काने मिळाले पाहिजे ते भविष्यात अन्यत्र वितरित करू देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका आपण घेतली आहे, अशी ग्वाही खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी दिली.
चास कमान धरण 100 टक्के भरले असल्याने साडी, चोळी व नारळ वाहून शनिवारी (दि. 5) आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी धरणाचे कार्यकारी अभियंता बी. के. शेटे, सहायक अभियंता प्रेमनाथ शिंदे, शाखा अभियंता उत्तम राऊत, उप अभियंता एस. एम. शिंदे, शाखा अभियंता सुप्रिया तनपुरे, भिवसेन गुंडाळ, सुदाम सावंत, रोहिदास नाईकडे, उद्धव नाईकडे, तुळशीराम बोंबले, रघुनाथ कडलग, बाळासाहेब आनंदकर उपस्थित होते.
आमदार मोहिते म्हणाले की, धरणात साठलेला गाळ काढावा यासाठी आपण शासनाकडे आग्रह धरला आहे. चास कमान धरणात गाळ साचू नये यासाठी धरणांतर्गत बंधारे बांधणे आवश्यक आहे. याबरोबरच पश्चिम भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल. भविष्यातील तालुक्यातील पाण्याचा प्रश्नगंभीर होणार आहे. म्हणून धरणातील पाण्याचे योग्य नियोजन व पाणीवाटप केले जाणार आहे. भामा आसखेड, चास कमान धरणग्रस्त शेतकऱ्यांवर शासन अन्याय करीत आहे. आगामी अधिवेशनात याबाबत कठोर भूमिका घेणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
पाण्यावर राजकारण……
चास कमान धरणातील पाण्यावर तालुक्यातील नागरिकांचा हक्क आहे, ते त्यांना प्रथम मिळाले पाहिजे. जवळपास तीन टीएमसी पाणी आरक्षित केले आहे. आज झपाट्याने लोकसंख्या वाढत आहे त्यांना पाणी कोठून देणार ? म्हणून धरणाचे पाणी जतन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमच्या हक्काचे पाणी आम्हाला मिळालेच पाहिजे. ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांना पाणी नाही; मात्र शिरूर तालुक्याला ते दिले जात आहे. हा कुठला न्याय. पाण्यावर राजकारण केले जात आहे. शासकीय यंत्रणा त्यासाठी राबत आहे.
तीनही धरणांतील पाणीसाठा…
धरण | एकूण पाणी पातळी (दशलक्ष घनमीटर) | एकूण साठा (दशलक्ष घनमीटर) | उपयुक्त साठा (दशलक्ष घनमीटर) | धरण भरले (टक्के) |
आतापर्यंतचा पाऊस (मिमी) | विसर्ग (क्युसेक) |
चासकमान | 649.53 | 241.69 | 214.50 | 100 | 618 | 550 |
भामा आसखेड | 670.49 | 215.42 | 201.90 | 92. 99 | 701 | 00 |
कळमोडी | 687.00 | 42.47 | 42.67 | 100 | 877 | 129 |