नवी दिल्ली – मोदी सरकारचा सध्याचा कारभार म्हणजे मिनीमम गव्हर्नमेंट मॅक्झिमम प्रायव्हेटायझेशन असा झाला आहे अशी टीका कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. ट्विटरवर त्यांनी आज हा हल्ला केला आहे.
सरकारी सेवांमध्ये नवीन पदांची निर्मिती करण्यास बंदी घालण्यात आल्याच्या एका बातमीच्या अनुषंगाने त्यांनी ही टीका केली असून त्या बातमीचे कात्रणही त्यांनी या ट्विटर संदेशाला जोडले आहे. मोदींनी मिनीमम गव्हर्नमेंट मॅक्झिमम गव्हर्नन्स अशी घोषणा लोकप्रिय केली होती. पण त्या घोषणेला तिलांजली देऊन मोदींनी आता देशात केवळ खासगीकरणाच्या माध्यमातून सरकारी कंपन्या विकण्याचेच धोरण राबवले आहे, असे राहुल गांधी यांनी या ट्विटरद्वारे सूचित केले आहे.
करोनाचे कारण दाखवून सरकारी कार्यालयांमध्ये कायमस्वरूपी कर्मचारीच ठेवायचे नाहीत असा मोदींचा इरादा आहे असा आरोपही त्यांनी केला आहे.
मोदींनी केवळ आपल्या उद्योगपती मित्रांची पाठराखण करून देशातील युवकांच्या मात्र नोकऱ्या हिसकावल्या आहेत असा आरोपही राहुल गांधी यांनी केला आहे. लोकांनी या विरोधात आवाज उठवावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.