आता कक्षा बदलाचा पुढचा टप्पा 30 ऑगस्टला
बंगळुरू: भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोने बुधवारी “चांद्रयान-2’ला चंद्राभोवतीच्या नव्या कक्षेत स्थापित केले. ही प्रक्रिया ठरल्याप्रमाणे सकाळी 9 वाजून 4 मिनिटांनी सुरु झालेली आणि “चांद्रयान-2′ चंद्राच्या तिसऱ्या कक्षेत यशस्वीरित्या स्थिरावले. चंद्राच्या पृष्ठभागावर पोहचण्यासाठी आणखी अकरा दिवसांचा प्रवास करावा लागणार आहे.
इस्रोच्या वतीने दिलेल्या माहितीनुसार, “चांद्रयान-2’चा प्रवास निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार योग्यपद्धतीने सुरू आहे. तसेच यान पूर्णपणे सुस्थितीत असल्याचे सांगण्यात आले. आता “चांद्रयान-2’चा कक्षा बदलाचा पुढचा टप्पा 30 ऑगस्टला होणार आहे. 30 ऑगस्ट आणि त्यानंतर एक सप्टेंबरला आणखी दोन वेळा “चांद्रयान-2’ची कक्षा बदलली जाणार आहे. कक्षा बदलाच्या या प्रक्रियेतंर्गत “चांद्रयान-2’ला चंद्राच्या जवळ नेले जात आहे. 20 ऑगस्टला इस्रोने 29 मिनिटांचे ऑपरेशन केले. त्यामध्ये “चांद्रयान-2’ने पृथ्वीची कक्षा सोडून चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला.
दरम्यान, दोन सप्टेंबरला विक्रम लॅंडर “चांद्रयान-2’पासून वेगळे होईल. सात सप्टेंबरला रात्री 1.55 मिनिटांनी विक्रम लॅंडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. त्यानंतर खऱ्या अर्थाने भारताच्या चंद्रावरील शोधकार्याला सुरुवात होईल. भारतासाठी ही अत्यंत महत्त्वकांक्षी मोहिम आहे. चंद्राच्या कक्षेत पोहोचलेले “चांद्रयान-2′ चंद्राचे वेगवेगळे फोटो पाठवत आहे.