नवी दिल्ली – जवळपास दीड महिन्यापूर्वी म्हणजेच २२ जुलै रोजी श्रीहरिकोटा येथील प्रक्षेपण केंद्रावरून झेपावलेले “चांद्रयान-२′ अनेक महत्त्वाचे टप्पे पार पाडत चंद्राजवळ पोहोचले. परंतु, चंद्राच्या केवळ २.१ किमी दूर असताना “विक्रम’ लॅंडरसोबत इस्रोशी संपर्क तुटला. यानंतर इस्रोचे शास्त्रज्ञ अद्यापही विक्रम लँडरशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, विक्रम लँडरशी संपर्क होण्याची आशा आता हळूहळू संपत चालली आहे. कारण चंद्रावर रात्र होण्यास केवळ ३ तासच शिल्लक राहिले आहेत.
विक्रम लॅण्डरची ७ सप्टेंबर रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर हार्ड लँडिंग झाले. त्यावेळी चंद्राच्या दक्षिण भागावर सूर्याची किरणे पडण्यास सुरुवात झाली होती. पृथ्वीचे चौदा दिवस म्हणजे चंद्रावरचा एक दिवस असतो. त्यामुळे लॅंडर, रोव्हरची रचना दिवसा काम करण्याच्या दृष्टीने करण्यात आली होती. यामुळे २१ सप्टेंबर रोजी विक्रम लॅण्डर आणि प्रज्ञान रोव्हरचा १४ दिवसांचा मिशनचा कालावधीही संपुष्टात येणार आहे. यामुळे विक्रम लॅण्डरशी संपर्क साधण्याच्या आशा धूसर होण्यास सुरुवात झाली आहे. नासाही आपले ऑर्बिटर पाठवून विक्रम लॅण्डरच्या स्थितीबाबत माहिती देणार होते. विक्रमबरोबर संपर्क साधण्यासाठी इस्रोकडे फक्त २१ सप्टेंबरपर्यंतचा वेळ कारण त्यानंतर चंद्रावर रात्र सुरु होईल. रात्रीच्यावेळी चंद्रावर कडाक्याचा थंडावा असतो. त्या वातावरणात लॅंडर, रोव्हर काम करण्याची शक्यता नाही.
दरम्यान, इस्रोने आज ट्विटरद्वारे संपूर्ण देशवासीयांचे आभार मानले आहेत. ‘तुम्हा सर्वांचे आभार. आम्ही जगभरात भारतीयांची आशा आणि स्वप्नांनी प्रेरित होऊन पुढे वाटचाल करत राहू’, असे ट्विट इस्रोने केले आहे. या ट्विटवरून इस्रो आपल्या पुढील मिशनकडे वाटचाल करत असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Thank you for standing by us. We will continue to keep going forward — propelled by the hopes and dreams of Indians across the world! pic.twitter.com/vPgEWcwvIa
— ISRO (@isro) September 17, 2019