भोपाळ – इतर मागासवर्गीयांना 27 टक्के आरक्षण मिळावे या मागणीसाठी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना घेराव घालण्याच्या तयारीत असलेल्या भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद आणि अन्य कार्यर्क्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. भोपाळ विमानतलावरच आझाद आणि त्यांच्या 12 ते 13 समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे भोपाळचे पोलिस आयुक्त मकरंद देऊस्कर यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.
विमानतळावर भीम आर्मीचे 1,500 कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांना पोलिसांनी परत पाठवून दिले. हे सर्व कार्यकर्ते रोशनपुरा चौकात एकत्र जमणार होते. तेथून ते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाणार होते, असेही पोलिसांनी सांगितले.
दरम्यान मुख्यमंत्र्यांना शांततेने निवेदन दिले जाणार होते. मात्र पोलिसांनी बळाचा वापर केला आणि कार्यर्क्त्यांना धक्काबुक्की केली, असा आरोप ओबीसी महासभेचे राष्ट्रीय सरचिटणीस तुलसीराम पटेल यांनी केला. भीम आर्मी आणि आदिवासी संघटना जय युवा आदिवासी शक्ती ओबीसी कोट्यासाठी त्यांच्या संघर्षात सहयोगी आहेत, असेही त्यांनी सांगितले.
भाजप सरकार बलाचा वापर करून ओबीसींच्या आरक्षणाचे आंदोलन दडपू पहात आहे, अशी टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांनी ट्विटद्वारे केली आहे. ओबीसी, आदिवासी आणि दलित त्यांच्या न्याय्य मागण्यासाठी आंदोलन सुरूच ठेवतील आणि या आंदोलनाला कॉंग्रेसचा पाठिंबा असेल, असेही त्यांनी म्हटले आहे.