औरंगाबाद – कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेबांनी शाळा उघडण्याकरिता लोकांकडे भीक मागितली, असे वादग्रस्त विधान भाजप आमदार चंद्रकांत पाटल यांनी केले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वारंवार महापुरुषांवर वादग्रस्त विधान करीत असतात. त्यातच आता चंद्रकांत पाटलांच्या विधानाने पुन्हा एकदा राजकीय वातावरण चिघळणार आहे.
पैठणमधील एका कार्यक्रमात ते बोलत होते. चंद्रकांत पाटील म्हणाले, देशात शाळा कोणी सुरू केल्या, कर्मवीर भाऊराव पाटलांनी सुरू केल्या. महात्मा ज्योतिराव फुलेंनी केल्या. या सगळ्या शाळा सुरू करताना सरकारने त्यांना अनुदान नाही दिले. त्यांनी लोकांकडे भीक मागितली. शाळा सुरू करायची आहे, मला पैसे द्या. त्या काळात 10 रुपये देणारे होते. आता 10-10 कोटी रुपये देणारी लोक आहेत, असे विधान त्यांनी केले.
या विधानावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला. अमोल मिटकरी म्हणाले, भाजपमधील आणखी एका वाचाळविराने मुक्ताफळे उधळली. भाजपात वाचळवीर आहेत, हे चंद्रकांत पाटील यांनी परत दाखवून दिले आहे. कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकवर्गणी आणि लोकसहभातून शाळा उभारल्या. स्वत: जवळील पैसेही या महापुरुषांनी शाळांसाठी खर्च केले. त्यांनी भीक नाही मागितली. या तीनही महापुरुषांचा अपमान करणाऱ्या चंद्रकांत पाटलाचा जाहीर निषेध, असे ट्विट त्यांनी केले.