शिमला – विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलेल्या गुजरातमध्ये भारतीय जनता पार्टीने मुख्यमंत्री कोण होणार हे कालच जाहीर करून टाकले आणि शपथविधी सोहळ्याचा मुहुर्तही घोषित केला. मात्र प्रदीर्घ काळानंतर हिमाचमध्ये यशाची चव चाखलेल्या कॉंग्रेसमध्ये आता कौन बनेगा मुख्यमंत्री खेळ सुरू होण्याची चिन्हे आहेत. त्याचे कारण खुर्ची एक आणि दावेदार पाच असा मामला या राज्यात आहे. त्याचा पहिला फटका केंद्रीय निरिक्षक म्हणून दिल्लीतून आलेल्या नेत्यांना बसला.
भाजप ऑपरेशन लोटस करेल या धास्तीने कॉंग्रेसने काही नेत्यांना तातडीने शिमल्याला पाठवले खरे. मात्र याच निरिक्षकांच्या वाहनासमोर मुख्यमंत्रिपदाच्या दावेदार असलेल्या प्रतिभासिंह यांच्या समर्थकांनी शक्ती प्रदर्शन केले. काही वाहिन्यांनी दिलेल्या बातम्यांनुसार निरिक्षकांचा ताफाच चक्क अडवण्यात आला. विशेष मिशनवर दिल्लीमार्गे आलेले छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचा ताफा शिमल्यातील ओबेरॉय हॉटेलसमोर अडवला गेला. अडवणारे प्रतिभासिंह यांच्या घोषणा देत होते. बघेल यांच्या गाडीला घेरावच घालण्यात आला होता. प्रतिभासिंह या कॉंग्रेसच्या खासदार आहेत व त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवलेली नाही. पण पक्षाच्या प्रचाराची धुरा त्यांनीच समर्थपणे सांभाळली असे सांगितले जाते.
सुखविंदर सिंग सुखु, मुकेश अग्निहोत्री आणि हर्षवर्धन चौहान हे अन्य दावेदार आहेत. मावळत्या विधानसभेत विरोधी पक्षनेते असलेल्या सुखू समर्थकांनीही ओबेरॉय हॉटेलच्या बाहेर आपली ताकद दाखवली.
दरम्यान, पक्षात कोणतीही गटबाजी नाही. सगळे आमच्यासोबत असल्याचे प्रतिभासिंह यांनी म्हटले असून आपल्याला मुख्यमंत्री व्हायचे असल्याचा स्पष्ट संदेश त्यांनी दिला आहे. त्याचे कारण माझे आपले दिवंगत पती आणि हिमाचलचे दिग्गज नेते वीरभद्र सिंह यांच्या नावावरच निवडणूक लढवली गेली आणि जिंकली असे त्यांनी आपल्या समर्थकांना आज सांगितले.
निवडणुकीची जबाबदारी सोनियाजी आणि श्रेष्ठींनी आपल्याकडेच सोपवली होती. आपण राज्याचे नेतृत्व करू शकतो असे त्या म्हणाल्या. वीरभद्र सिंह यांच्या नावावर निवडणूक लढून आणि 40 जागा जिंकून त्यांच्याच कुटुंबाला बाजूला करणे योग्य नाही. वीरभद्र यांच्याशी लोकांचे घट्ट भावनिक संबंध असल्यामुळेच एवढ्या जागा मिळाल्या. श्रेष्ठींचा निर्णय अंतिम असेल. मात्र वीरभद्र यांचा वारसा दुर्लक्षित करता येऊ शकणार नाही अशा शब्दांत त्यांनी दिल्लीला थेट इशाराही दिला.