मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाला उत्तर दिले. त्यात त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली होती. त्यावरून आता काँग्रेसने पंतप्रधानांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. यानंतर महाराष्ट्रातील महाविकासआघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसच्या नेत्यांनी मोदींवर हल्लाबोल केला. दिल्लीत खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारने परप्रांतियांसाठी रेल्वे गाड्या सोडल्याचा पुरावा देत जोरदार टीका केली. त्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले, “लॉकडाऊनच्या काळात परप्रांतातून आलेल्या लोकांना आम्ही तुमची काळजी घेऊ, असा आत्मविश्वासदेखील हे मविआ सरकार देऊ शकलं नाही, हेच त्यांचं अपयश आहे. मोदीजींनी देशभरातील लोकांना सर्व सुविधा दिल्या, मात्र तुम्ही काय दिलं ? मविआ सरकारच्या दबावामुळेच ट्रेन सोडण्यात आल्या.
ते पुढे म्हणाले,’ट्रेन तुमच्या दबावामुळे सोडण्यात आल्या. पण लोकांना आत्मविश्वास देऊन त्या रिकाम्या जायला हव्या होत्या,” असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
दरम्यान,राष्ट्रवादीने ‘झुकझुक झुकझुक आगीन गाडीचं’ नव व्हर्जन आणत मोदींवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले, “श्रमिक ट्रेन सोडल्या म्हणून आधी त्याचे श्रेय घेतले. आता त्याच श्रमिक ट्रेनमधून गेलेल्या मजुरांद्वारे कोरोना पसरला असे दावे केले. चुनावजीवींचा पॅटर्नच वेगळा.”
राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून केलेल्या ट्वीटमध्ये मोदींचं कार्टून आणि रेल्वे दाखवली आहे. तसेच त्यावर “झुकझुक झुकझुक श्रमिक गाडी, प्रचाराच्या रेषा संसदेत काढी, थापांची पुडी सोडूया, सत्तेच्या गावाला जाऊया” असं लिहिलं आहे.