मुंबई: “आज राजकारणामध्ये झालेले बदल, जबाबदारीत झालेले बदल या सगळ्या बदलत्या संदर्भांचा विचार करुन आपला सर्वांचा पुढचा प्रवास ठरवण्याची आवश्यकता आहे”. माजी मंत्री पंकजा मुंडेंनी केलेल्या या फेसबुक पोस्ट ने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून, मुंडे या शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चाना उधाण आले होते. परंतु ‘पंकजाताई या भाजपला सोडून कुठल्याही पक्षात प्रवेश करणार नाहीत’. अशी अधिकृत प्रतिक्रीया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकातदादा पाटील यांनी दिल्याने या चर्चाना पूर्णविराम मिळाला आहे.
पंकजा मुंडेंची हि पोस्ट सोशल मीडियात मोठ्या प्रमाणावर झाली होती. त्यामुळे भाजपला पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण द्यावे लागले आहे. ” माजी बालकल्याण व ग्रामविकास मंत्री व भाजप नेत्या पंकजा मुंडे या भाजपला सोडचिठ्ठी देणार असल्याच्या अफवा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर उठत असून पंकजाताई या भाजपला सोडून कुठल्याही पक्षात प्रवेश करणार नाहीत. ” असे सांगत चंद्रकांत पाटील यांनी या अफवांवर पडदा टाकला आहे.
यावेळी बोलताना पाटील म्हणाले, ” आत्ताचे जे एक्सिडेंटल सरकार आले आहे, त्या सरकारच्या काही मंत्र्यांनी भाजपतील बडे नेते त्यांच्या संपर्कात असल्याच्या बतावण्या केल्या आहेत. सोशल मीडियावरही अनेक नेते भाजपच्या वाटेवर असल्याच्या अफवा उठत आहेत. मात्र, तसला कुठलाही प्रकार होणार नाही. पंकजा मुंडे यांचे भाजपच्या प्रवासातील योगदान मोठे आहे. आमदार आणि मंत्री म्हणून त्यांचे योगदान हे वाखाणण्या जोगे आहे. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर त्यांनी न डगमगता आपले राजकीय स्थान अबाधित ठेवले आहे. त्या भाजप सोबतच आहेत. ” , असे स्पष्टीकरण चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले.
दरम्यान पंकजा यांनी फेसबुक पोस्ट नंतर आता ट्विटर अकाउंट वरून भाजप व माजी मंत्री ही ‘ओळख’ हटवली आहे. त्यामुळे १२ तारखेला गोपीनाथ गडावर काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.