Chandrakant Patil : राज्यात मराठा आरक्षणावरून वातावरण चांगलेच तापले आहे. राज्य सरकारकडून लेखी आश्वासन दिल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतलं आहे. त्या राज्यातील मराठा समाजातील लोकांच्या कुणबी नोंदी शोधण्याचे काम सुरू आहे. तसेच ज्यांच्या कुणबी नोंदी आढळल्या आहेत, अशा लोकांना जात प्रमाणपत्र देण्याचे काम सरकारकडून केले जात आहे.
त्यातच मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू असले तरी नेमकं टिकणारं आरक्षण कधी मिळणार? याबाबत अद्याप स्पष्टता आली नाही. दरम्यान, भारतीय जनता पार्टीचे नेते आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सूचक विधान केलं आहे. तीन टप्प्याने मराठा आरक्षणाचा प्रश्न संपेल, असे मोठे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
मराठा आरक्षणावर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी, “राज्यात तीन कोटी लोकसंख्या असलेला मराठा समाज आणि साडे तीन कोटी लोकसंख्या असलेला ओबीसी समाज आहे. अशा सात कोटी समाजाच्या सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये एकमेकांबद्दल तिरस्कार निर्माण होत आहे. त्यामुळे तुम्हीही आणि ओबीसी नेत्यांनी याची काळजी घेतली पाहिजे. आपल्या संत महतांनी जी सामाजिक वीण गुंफली आहे, ती तोडणं किंवा जोडणं आपलं काम नाही. त्यामुळे तीन टप्प्याने मराठा आरक्षणाचा प्रश्न संपेल.” असे वक्तव्य केले आहे.
दरम्यान, राज्यात आता मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे आता पुन्हा एकदा महाराष्ट्र दौरा सुरु करणार आहेत. यावेळी त्यांनी ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण देण्याची मागणी केली आहे. एवढेच नाही तर त्यांनी सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी केली आहे.