पिंपरी – शनिवारी दुपारपासून सुरू झालेल्या पावसाने रात्रभर शहराला झोडपून काढले. विजेच्या लखलखाटासह रात्रभर पडलेल्या सरींनी वातावरणात गारवा निर्माण केला. परतीचा पाऊस आठवडाभर पडण्याची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम राज्यातील वातावरणावर झाला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागांत पाऊस पडत आहे. पुढील आठवडाभर राज्यात पाऊस राहणार असून मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला.
राज्यात काही प्रमाणात ढगाळ हवामान राहणार असून अनेक ठिकाणी पाऊस पडेल. राज्यात होत असलेल्या तुरळक ठिकाणच्या पावसामुळे काही ठिकाणी धुके पडत आहे. त्यातच दिवसभर पडत असलेल्या उन्हामुळे कमाल तापमानात चढउतार होत आहे. आजपासून पुण्यासह नगर, सातारा, सांगली, सोलापूर, या जिल्ह्यांतदेखील परतीचा पाऊस हजेरी लावणार आहे.
विजांचा कडकडाट
शनिवारी रात्रीपासूनच परतीच्या पावसाने शहरात दमदार हजेरी लावली. त्यानंतर रविवारी पहाटेपर्यंत पाऊस बरसत राहिला. मात्र, पहाटे साडे चार ते पाचच्या दरम्यान विजेच्या कडकडाटाच्या माध्यमातून निसर्गाचे रौद्र रुप पिंपरी-चिंचवडकरांनी अनुभवले. यावेळी शहराच्या विविध भागांतील वीजपुरवठा खंडित झाला होता.