मुंबई – बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले चक्रीवादळ आता विरले आहे. मात्र, राज्यात पुढील 48 तासांत वाऱ्याची तीव्रता वाढणार असल्याने तापमानात किमान दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. यासोबतच कोकणात सिंधुदुर्ग आणि आसपासच्या परिसरात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
देशाच्या हवामानावर चक्रीवादळाचा परिणाम आणखी काही दिवस दिसून येणार आहे. महाराष्ट्रासह देशात काही ठिकाणी पावसाची शक्यता कायम आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आग्नेय अरबी समुद्र आणि लगतच्या मालदीव परिसरात चक्रीवादळामुळे पुढील चार ते पाच दिवसांत केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल आणि लक्षद्वीपमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडेल.
आयएमडीच्या अंदाजानुसार, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, केरळ-माहे येथे काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर केरळ-माहे आणि लक्षद्वीपमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळाची शक्यता आहे. अंदमान- निकोबार बेटे, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, त्रिपुरा, उप-हिमालय, पश्चिम बंगाल, किनारी आंध्र प्रदेश, यानाम, रायलसीमा, तामिळनाडू, पुद्दूचेरी, कराईकल या भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
सोमवारी 11 डिसेंबरपासून देशाच्या विविध भागात किमान तापमानात घट होईल. उत्तर भारतात येत्या काही दिवसांत थंडी वाढणार आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत दिल्ली-एनसीआरमध्ये तापमानात 2 ते 3 अंशांची घट होईल. यासोबतच धुक्याचा चादरही दिसेल. 13 डिसेंबरपर्यंत देशाच्या विविध भागात पासवाची हजेरी पाहायला मिळणार आहे.