नवी दिल्ली – क्रीडा मंत्रालय आणि साईचा संयुक्त उपक्रमाचा भाग असलेल्या खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत महाराष्ट्राच्या बॅडमिंटनपटूंनी शानदार सुरुवात केली. महाराष्ट्राच्या आरती पाटील, लता उर्मेकर आणि तुलिका जाधव या तीन महिला खेळाडूंनी आपापल्या विभागातून उपांत्य पेरीत प्रवेश केला. पुरुष विभागात संभाजीनगरच्या निलेश गायकवाडने विजयी सलामी दिली. मात्र, मार्कला सलामीला पराभवाचा सामना करावा लागला.
कोल्हापूरच्या आरती पाटीलने महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रतिस्पर्धी सरुमथीचा अगदीच सहज पराभव केला. सरळ दोन गेममध्ये आरतीने सरुमथीचे आव्हान २२-२०, २१-९ असे परतवून लावले. तुलिकाला देखिल विजयासाठी फार काही करावे लागले नाही. तुलिकाने पौर्णिमा पांडेला २१-४, २१-६ असे सहज पराभूत केले.
लताची कामगिरी काही फार वेगळी नव्हती. तिलाही प्रतिस्पर्धी नलिनीकडून आव्हानच मिळाले नाही. संपूर्ण गेममध्ये लताने केवळ सात गुण गमावले. लताने ही लढत २१-२, २१-५ अशी जिंकली. रुहीला पुढे चाल मिळाल्यामुळे तिची वाटचाल विनासायास चालू राहिली. पुरुष एकेरीत निलेशला मात्र विजयासाठी संघर्ष करावा लागला. पहिल्या फेरीत त्याने कार्तिक क्रिष्णनला २१-११, १९-२१, २१-११ असे तीन गेमच्या संघर्षपूर्ण लढतीत पराभूत केली. तमिळनाडूच्या सुदर्शनने महाराष्ट्राच्या मार्कचा पराभव केला.
Guwahati Masters Badminton 2023 : अश्विनी-तनिषा जोडीने पटकावले विजेतेपद…
विजयाने किताबाचा दावा मजबूत
आम्हाला स्पर्धेत कडवे आव्हान मिळेल असे वाटले होते. पण, प्रत्यक्षात आम्ही सहज विजय मिळविले. यामुळे आमच्यात आत्मविश्वास निर्माण झाला असून, आता पदकाची खात्री निश्चितपणे देऊ शकतो. प्रतिस्पर्ध्यांना आम्ही संधी मिळू दिली नाही. अचूक नियोजनामुळे आम्हाला ही कामगिरी शक्य झाली. आता सोनेरी यशासाठी आम्ही सर्वस्व पणाला लावून असे आरती पाटीलने सांगितले.