श्रीकांत कात्रे
सातारा पोटनिवडणूक; रंगतदार अवस्थेत प्रचाराची रणधुमाळी
सातारा – सातारा लोकसभा पोटनिवडणुकीतील चुरस वाढली असून भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्यातील लढत रंगतदार अवस्थेत आहे. दोन्ही उमेदवार तुल्यबळ असल्याने काटे की टक्कर असली तरी पंतप्रधानांसह प्रमुख नेत्यांच्या सभा होणार असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसला ही जागा राखण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे.
लोकसभेच्या पाच महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून उदयनराजे भोसले विजयी झाले. मात्र, त्यांनी खासदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ही पोटनिवडणूक होत आहे. विधानसभा निवडणुकीबरोबरच पोटनिवडणूक होत असल्याने सहा मतदारसंघांतील समीकरणे वेगवेगळी आहेत. त्याचा फायदा दोन्ही उमेदवारांना होऊ शकतो.
उदयनराजे व श्रीनिवास पाटील दोन्ही मातब्बर उमेदवार असल्याने राज्याचे लक्ष या लढतीकडे आहे. उदयनराजे या मतदारसंघातून तीनदा खासदार झाले. मतदारसंघातच नव्हे तर राज्यभरात तरुणाईमध्ये ते लोकप्रिय आहेत. श्रीनिवास पाटील पूर्वीच्या कराड मतदारसंघातून दोन वेळा खासदार होते. नंतर ते सिक्कीमचे राज्यपाल होते.
कॉंग्रेस आघाडीकडून लढण्यास पृथ्वीराज चव्हाण यांनी नकार दिल्याने पाटील यांना उमेदवारी करावी लागत आहे. उदयनराजे समर्थकांकडून पाटील यांच्या वयाचा मुद्दा मांडला जात आहे. प्रशासकीय कामाचा अनुभव मतदारसंघाला लाभदायक ठरेल, असा दावा पाटील समर्थकांकडून केला जात आहे. उदयनराजे यांच्या जमेच्या बाजूंमध्ये तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात त्यांच्यासमवेत असतो. खासदारकीच्या दोन टर्ममध्ये खासदार निधीतून मतदारसंघात विविध प्रकारची विकास कामे करण्यात आली आहेत.
साताऱ्यातील पोवई नाक्यावरील ग्रेडसेपरेटर, कास तलावाची उंची वाढविण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न मूर्त स्वरुपात दिसू लागले आहेत. औद्योगिक विकास आणि स्थानिक रोजगार उपलब्धतेबाबत मात्र विरोधकांची त्यांच्यावर टीका होत आहे. पक्षीय पातळीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मात्र त्यांच्यासमोर मोठे आव्हान आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गावपातळीपर्यंतचे केडर आतापर्यंत उदयनराजे यांच्यासमवेत होते. ते आता नाही. भाजपनेही बूथवाइज संघटन केले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे केडर आणि भाजपचे संघटन यातील फायद्यातोट्यावर लढतीचे गणित अवलंबून आहे.
विधानसभा मतदारसंघनिहाय लक्षात घेतले तरी दोन्ही उमेदवार समसमान ताकदीचे ठरणार आहेत. सातारा, पाटण या मतदारसंघांत भाजप व शिवसेनेचे उमेदवार ताकदीचे आहेत. कराड दक्षिणमध्येही तुल्यबळ लढत आहे. कराड उत्तर, वाई आणि कोरेगाव या तीन मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मातब्बर आमदार आहेत. तरीही तिन्ही ठिकाणी युतीनेही तगडे उमेदवार दिले आहेत. त्यामुळे सर्वच विधानसभा मतदारसंघांत चुरस आहे. दोन्ही निवडणुकांसाठी भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोन्ही पक्षांसाठी मतदानाचे आवाहन केले जात आहे. विधानसभा मतदारसंघात दुहेरी आवाहन कशा पद्धतीने होणार ते महत्त्वाचे ठरणार आहे.
समन्वयाचा प्रचार महत्त्वाचा
लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचार विधानसभा मतदारसंघनिहाय करावा लागत आहे. त्यासाठी विधानसभा उमेदवार व लोकसभा उमेदवार एकमेकांच्या समन्वयाने प्रचाराची आखणी करत आहेत. मतदारसंघ मोठा असल्याने कमी दिवसांत अधिक लोकापर्यंत पोचण्याची कसोटी आहे. त्यात उदयनराजेंनी चांगलीच आघाडी घेतली आहे. पदयात्रा, कोपरा सभा, सभा याद्वारे समन्वयातून लोकापर्यंत पोचण्यासाठी प्रयत्न आहेत. राष्ट्रवादीकडून तसे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, एकत्रित समन्वयाचे चित्र दिसण्यासाठी आणखी मेहनतीची गरज आहे.
नेत्यांच्या सभांनंतर मिळणार कलाटणी…
आता तुल्यबळ वाटणाऱ्या पोटनिवडणुकीच्या लढतीत महत्त्वाचा प्रमुख नेत्यांच्या सभांनंतर कसा फरक पडणार यावर निकालाचे गणित अवलंबून आहे. भाजपतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पक्षाध्यक्ष अमित शहा या प्रमुख नेत्यांसह आणखी नेते सभा घेणार आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासह जयंत पाटील, अजित पवार, अमोल कोल्हे यांच्या सभा होणार आहेत. यापैकी कोणत्या नेत्यांच्या सभा किती प्रभावी ठरणार, यावरच पोटनिवडणुकीला कलाटणी मिळणार की नाही ते भवितव्य ठरणार आहे.