करोनाची लस घेण्यासाठी लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू होण्यापूर्वी एक कोटीपेक्षा अधिक लोकांनी नावनोंदणी केली आहे, यावरून लसीबद्दल लोकांचे जे गैरसमज होते ते दूर झाले असून, लोक आश्वस्त झाले आहेत, हे लक्षात येते. विशेषतः 18 ते 44 वर्षे वयोगटातील लोकांना लसीची प्रतीक्षा अधिक आहे. हा नोकरी-व्यवसायासाठी घराबाहेर पडणारा वर्ग आहे आणि लॉकडाऊनसारख्या उपाययोजनांमुळे त्यांच्यावर मोठा परिणाम झाला असल्यामुळे लवकरात लवकर लस घेण्यास हा वर्ग उत्सुक आहे.
आपल्या कर्मचारी वर्गाने लवकरात लवकर कामावर परतावे, असे सर्वच लहान-मोठ्या कंपन्यांना वाटत आहे. काही कंपन्या तर कर्मचारी वर्गाच्या लसीकरणासाठी होणारा खर्चही उचलण्यास तयार आहेत. अशा रीतीने एकीकडे लसीकरणासाठी लोक उत्साहाने तयार होत असताना लसींचा मात्र तुटवडा जाणवत आहे. अनेक राज्यांना जून-जुलैपर्यंत पुरतील एवढ्याच लसीच्या मात्रा उपलब्ध होऊ शकतात. लसींची कमतरता असतानाच करोनाच्या तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू झाल्याने लोक अक्षरशः हैराण झाले आहेत. अशा प्रकारे निर्बंधांसह किती दिवस, किती वर्षे जगावे लागणार आणि करोनाच्या अशा किती लाटा एका पाठोपाठ एक येणार, असाच प्रश्न सर्वांना पडला आहे.
महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन आणखी पंधरा दिवसांनी वाढवला असून, करोनाची तिसरी लाट येऊ शकते; त्यामुळे तयार राहा, असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. दुसऱ्या लाटेची तीव्रता मे महिन्याच्या अखेरीस ओसरत जाईल, अशी शक्यता असतानाच तिसऱ्या लाटेसाठी तयारी करणे हे आरोग्य यंत्रणेपुढील मोठे आव्हान ठरणार आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्यासमवेत एक प्रदीर्घ बैठक नुकतीच केली. लॉकडाऊनसारख्या उपाययोजनांमुळे परिस्थिती थोडी स्थिर झाली असली, तरी आपल्याला तिसऱ्या लाटेसाठी तयार राहावे लागेल, असे त्यांनी सांगितले.
ऑक्सिजन आणि काही औषधांच्या टंचाईमुळे राज्यात आणि देशात काही लोक मृत्युमुखी पडले आहेत, त्यामुळे तिसऱ्या लाटेपूर्वी आपल्याला ऑक्सिजनचा आणि रेमडेसिविरसारख्या इंजेक्शनचा प्रश्न सोडवावाच लागेल. तज्ज्ञांच्या मते जुलैपर्यंत करोनाची तिसरी लाट येऊ शकते. म्हणजेच, दुसऱ्या लाटेतून बाहेर पडता-पडताच आपल्याला तिसऱ्या लाटेची गाज ऐकू येणार आहे. दुसऱ्या लाटेत आरोग्य यंत्रणेत ज्या कमतरता राहिल्या, त्या तिसऱ्या लाटेच्या वेळी असू नयेत असे वाटत असल्यास आतापासूनच तयारीला लागायला हवे.
ऑक्सिजन निर्मितीसाठी नवी संयंत्रे कुठे आणि किती स्थापित करता येतील, याचा अंदाज घेण्यास मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले आहेच; परंतु रेमडेसिविरसारख्या औषधांचा होणारा काळाबाजार रोखण्याचे मोठे आव्हान यंत्रणेसमोर आजही आहे आणि तिसऱ्या लाटेवेळीही असेल. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जुलै आणि ऑगस्टमध्ये महाराष्ट्रात तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. काही तज्ज्ञांच्या मते ती सप्टेंबरमध्ये येऊ शकते. राज्यासह संपूर्ण देशात सध्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलेले असतानाच तिसऱ्या लाटेची लागलेली चाहूल अत्यंत भयावह आहे. जगात ज्या ज्या ठिकाणी तिसरी लाट पसरली, तिथे-तिथे तिने भयंकर रूप धारण केले, हा अनुभव आहे. त्यामुळे दुसऱ्या लाटेदरम्यान ऑक्सिजनच्या बाबतीत जे घडले, तसे तिसऱ्या लाटेच्या वेळी झाल्यास खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला असून, तिसऱ्या लाटेपूर्वी ऑक्सिजनच्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण असायला हवे, असे आरोग्यमंत्री टोपे यांनीही म्हटले आहे.
राज्याला सध्या 1715 टन ऑक्सिजन लागत आहे. तेवढा ऑक्सिजन तिसऱ्या लाटेवेळीही उपलब्ध असेल आणि त्याची वाहतूकही सहजसोपी होईल, अशी काळजी घेणे गरजेचे आहे. रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर मर्यादित करणे आवश्यक आहे. केवळ मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी आहे म्हणून किंवा काळाबाजार होत आहे म्हणून नव्हे तर अनेक रुग्णांना रेमडेसिविर आवश्यकता नसताना दिले जात असल्याचेही दिसून आले असून, काही रुग्णांवर त्याचे दुष्परिणामही दिसत आहेत. करोनाच्या एकापाठोपाठ एक येत असलेल्या लाटा हे आपल्याला वादळच म्हणावे लागेल आणि ते घडून येणे नैसर्गिक असले तरी त्यामुळे होणारे नुकसान वाढण्यात काही मानवनिर्मित घटक कारणीभूत आहेत.
ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे उडालेला हाहाकार आपण पाहिला आहे. शिवाय अनेक ठिकाणी रुग्णवाहिकेसाठी ताटकळत बसलेल्या रुग्णाला घेण्यास रुग्णवाहिका लवकर येत नाही, असेही दिसून आले आहे. स्मशानभूमीतसुद्धा अंत्यसंस्कारांसाठी जागा मिळत नाही, अशी स्थिती आहे. अनेक ठिकाणी अग्निकुंडांची संख्या वाढवली, तरीही जागा अपुरीच पडते आहे. दररोज साडेतीन लाख रुग्णसंख्या देशाने पाहिली आणि ती जगात सर्वाधिक आहे. जगभरातील काही देशांनी भारतातून येणाऱ्या विमानांना बंदी केली,
त्याचबरोबर अनेक देशांनी भारताला मदतही देऊ केली. याचाच अर्थ, दुसरी लाट अत्यंत भयावह असून, रोज वाढत असलेली रुग्णसंख्या कधी थांबणार आणि वाढता मृत्युदर कधी कमी होणार, याची प्रतीक्षा सर्वांना आहे. किमान मानवनिर्मित कारणांमुळे मृत्यू होऊ नयेत, अशी व्यवस्था आपण तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्यापूर्वी करून ठेवायला हवी. त्या दृष्टीने दुसऱ्या लाटेतील अनुभवाचा वापर करून यंत्रणा आधीच मजबूत करून ठेवायला हवी. करोनाचा हा कहर संपूर्ण जगाप्रमाणेच भारतालाही नवीन आहे. इथली आरोग्य व्यवस्थाही तुटपुंजी आहे आणि डॉक्टरांची संख्याही मर्यादित आहे. तथापि, अनुभव येत आहेत, तसतसे आपण स्वतःमध्ये आणि व्यवस्थेमध्ये बदल घडवून आणलेच पाहिजेत.
तिसऱ्या लाटेला सामोरे जाताना ढिसाळपणा बिलकूल कामाचा नाही. त्या दृष्टीने आपण दुसऱ्या लाटेतील अनुभवांकडे डोळसपणे पाहून तयारी केली पाहिजे. दुसऱ्या लाटेच्या प्रसारास डबल व्हेरिएन्ट म्हणजे विषाणूच्या दोन जातकुळींचा संयोग होऊन तयार झालेला विषाणू अधिक जबाबदार असल्याचे मानले जाते. विषाणूच्या जीनोम सिक्वेन्सिंगचे काम देशातील दहा प्रमुख प्रयोगशाळांना एकत्र आणून उभारलेली नवी यंत्रणा करीत आहे. हे सिक्वेन्सिंग जेवढे अधिक प्रमाणात होईल, तेवढ्या लवकर आपल्याला नवनवीन व्हेरिएन्टचा म्हणजे उत्परिवर्तनाचा अंदाज येईल आणि आपल्याला तयार राहता येईल. डबल व्हेरिएन्टनंतर एक तिहेरी उत्परिवर्तनाचा विषाणूही आढळल्याची बातमी काही दिवसांपूर्वी आली होती. अशा बाबींकडे अजिबात दुर्लक्ष करता कामा नये.
दुहेरी उत्परिवर्तन असलेला विषाणू आपल्याला ऑक्टोबर 2020 मध्येच समजला होता, असे सांगितले जाते. असे असल्यास दुसऱ्या लाटेत होत असलेली हानी प्रमाणापेक्षा अधिक आणि पुरेशी तयारी नसल्याने झालेली वाटते. तिसऱ्या लाटेवेळी मात्र तसे होता कामा नये. एक तर हा विषाणू जगाला नवीन आहे. त्यातील उत्परिवर्तनाची जास्तीत जास्त माहिती आपल्याकडे असणे हे मोठे शस्त्र ठरते. सर्वांत महत्त्वाचे आहे लसीकरण. सुरुवातीला अत्यंत वेगाने झालेल्या लसीकरणाचा वेग नंतर लसींच्या तुटवड्यामुळे मंदावला. त्यातच पुरवठा कुणामुळे कमी झाला, या प्रश्नावरून राजकारण रंगले.
एकाच देशात लसीच्या वेगवेगळ्या किमती कशा, हाही वादाचा विषय झाला; परंतु आता मात्र वादाच्या पलीकडे जाऊन जास्तीत जास्त लसीकरण होईल, असे पाहायला हवे. आपली लोकसंख्या प्रचंड आहे. अठरा वर्षांवरील युवकांना लस देण्याचे मान्य करण्यात आले असले, तरी लस घेण्यासाठी प्रचंड संख्येने युवक येतील तेव्हा तेवढ्या संख्येने लस उपलब्ध असायला हवी. 45 वर्षांवरील लोकांना लस देतानाच उडत असलेली झुंबड आपण पाहतो आहोत. 18 ते 44 हा वयोगट संख्येने खूप मोठा आहे.
त्यामुळे लसीकरणासाठी होणारी गर्दी शक्य तेवढी टाळली पाहिजे. अन्यथा गर्दी होऊ नये म्हणून घातलेल्या निर्बंधांचा काही परिणामच होणार नाही. जोपर्यंत लसीकरण मोठ्या संख्येने होत नाही, तोपर्यंत निर्बंध पाळावे लागणार आणि जितके अधिक लसीकरण होईल तितका तिसऱ्या लाटेचा परिणाम सौम्य असणार. एवढ्या दोन गोष्टी लक्षात घेऊन जरी केंद्र आणि राज्याने वाटचाल केली आणि ऑक्सिजन तसेच रेमडेसिविरच्या बाबतीत सध्याची अंदाधुंदी टाळली, तरी तिसऱ्या लाटेला थोपविणे अवघड जाणार नाही.