श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी स्थापलेली गणेशमूर्ती आजही जतन
पुणे – करोनामुळे यंदा शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा स्तुत्य निर्णय घेतला आहे. यामध्ये श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक गणपती ट्रस्टचे नाव अग्रक्रमाने घेण्यात येत आहे. नागरिकांनी “पर्यावरणपूरक’ गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करावी, यासाठीदेखील ट्रस्टने पुढाकार घेतला आहे. विशेष म्हणजे, मंडळाची “श्रीं’ची मूर्ती पर्यावरणपूरक आहे.
नागरिकांनी एकत्र येण्याच्या उद्देशाने सुरू झालेला पुण्याचा गणेशोत्सव संपूर्ण जगासाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. दिवसेंदिवस या उत्सवाचे स्वरूप वाढत गेले. कालांतराने मातीच्या मूर्तींची जागा प्लॅस्टर ऑफ पॅरिसने घेतली. परंतु, जागतिकीकरणाबरोबर बदलणारी पर्यावरणाची स्थिती पाहता, आता पर्यावरणपूरक मूर्तींची गरज भासत आहे.
“इंग्रजांविरुद्धच्या लढ्यात भाऊसाहेब रंगारी आणि त्यांचे सहकारी एकत्र आले होते. त्यावेळी नागरिकांना एकत्र आणण्यासाठी, सामाजिक संदेश पोहोचवण्यासाठी त्यांनी सार्वजनिक गणपती बसविला. सन 1892 मध्ये श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी कागदाचा लगदा आणि लाकडाचा भुसा वापरून गणेश मूर्तीची निर्मिती केली होती. आजही याच मूर्तीचे पूजन सुरू आहे. याशिवाय भाऊसाहेब रंगारी यांनी तयार केलेल्या लाकडी रथाचे जतन करण्यात आले आहे. केवळ गणेशोत्सवाच्या काळात ही मूर्ती उत्सव मंडपात आणण्यात येते. दरवर्षी मूर्तीला रंग देण्यात येतो,’ असे ट्रस्टचे अध्यक्ष संजीव जावळे यांनी सांगितले.