मुंबई : सुधारीत नागरिकत्व कायद्याने (का) देशाच्या एकतेला केंद्र सरकारने तडा गेला आहे, सरकारच्या हुकुमशाही धोरणांना महात्मा गांधी यांच्या अहिंसक मार्गाने तोंड देण्याची वेळ आली आहे, असे आवाहन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले.
का, राष्ट्रीय नागरिकत्व सुची आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील हिंसाचाराच्या विरोधातील माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी काढलेल्या गांधी शांती यात्रेच्या उद्घाटन प्रसंगी पवार बोलत होते. ते म्हणाले, जेएनयुमध्ये अलिकडे झालेला हिंसाचार हा विद्यार्थ्यांच्या भावना दुखावणारा आहे. हे सरकार हुकुमशाही धोरणे राबवत आहे. जेएनयुत जे घडले त्याचा देशभर निषेध होत आहे. सरकारच्या या हुकुमशाहीला गांधीजींच्या अहिंसक मार्गाने तोंड देण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले.
या देशातील नागरीक हे या स्वतंत्र भारताचे प्रतिनिधी आहेत या देशाचे भागधारक आहेत. का सारख्या खेळ्या करून हे सरकार देशातील लोकांना निराश बनवत आहे. समाजातील मोठा वर्ग का कायद्यामुळे नाराज आहे, असे ते म्हणाले.
देशाच्या ऐक्याला तडा देणारी काही पावले सरकारकडून उचलली जाताहेत. समाजातील लहान घटकांना आपल्या हितांचे संरक्षण होत नाही असे वाटत आहे,असे सांगून पवार म्हणाले, अल्पसंख्यांकासह समाजातील अनेक वर्गांना ते कोठून आले, कोठे राहणार आहेत, याची कल्पना नाही. त्यांना जबरदस्तीने सरकारने उभारलेल्या शिबिरात पाठवले जाईल. त्यामुळे स्वतंत्र भारताच्या प्रतिनिधींमध्ये देशाच्या भागधारकांमध्ये निराशा पसरली आहे. अशा वेळी समाजातील सर्व वर्गात एकोपा राहणे गरजेचे आहे, असे पवार म्हणाले. सरकारला गांधीजींचा अहिंसेचा योग्य मार्ग दाखवण्याची वेळ आली आहे. त्यामुळेच या देशाचे संविधान वाचू शकेल.
सिन्हा म्हणाले, डॉ. आंबेडकरांनी लिहलेल्या घटनेचे आम्ही संरक्षण करू. या देशाची आम्ही पुन्हा फाळणी होऊ देणार नाही. गांधीजींची हत्या पुन्हा होऊ देणार नाही. आपण सर्व एक आहोत आणि एक राहू.
कॉंग्रेस नेते आशिष देसमुखही या यात्रेत सहभागी झाले. ते म्हणाले, फडणवीस सरकारच्या काळात राज्यात रा. स्व. संघाशी संबंधीत असलेल्या कुलगुरूंची नियुक्ती केली. त्यांना तातडीने पदमुक्त करावे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राज्याचे मंत्री नवाब मलिक, वंचित बहुजन विकास आघाडीचे प्रकाश आंबेडकर, तृणमूल कॉंग्रेसचे नदीमूल हक आणि अन्य मान्यावर उपस्थित होते.