तळेगाव ढमढेरे-माणूस म्हणून अस्तित्व स्वीकारणे ही महत्त्वाची बाब असून एकदा माणसाचे अस्तित्व स्विकारले तर वाद होत नाही संवाद सुरू होतो. जेव्हा संवाद सुरू होतो तेव्हा कायद्यांच्या कलमावर बोट ठेवण्यापेक्षा आधी माणसाला माणूस म्हणून त्याला मान्य करू, असे प्रतिपादन शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.
तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील साहेबराव शंकरराव ढमढेरे कला व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय मानव अधिकार आयोग भारत यांच्या सहकार्याने मानव अधिकार प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. कोल्हे बोलत होते. ते म्हणाले संपूर्ण मतदार संघातील युवाबरोबर संवाद करणार आहोत. सावित्रीबाई फुले यांनी महिला शिक्षणाचे दरवाजे उघडे करून माता-भगिनींना मानवतेच्या दृष्टीने सक्षम करण्याचे काम केले आहे. बाबासाहेबांनी समाजातील रंजले गांजलेल्यांना पुन्हा उभे करून लढण्याची ताकद दिली. यावेळी शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कौस्तुभकुमार गुजर, उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते, मानद सचिव अरविंद ढमढेरे, पोपट भुजबळ, शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक महेश ढमढेरे, बाळासाहेब नरके, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पराग चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
महाविद्यालयीन युवकांसाठी आयोजित केलेल्या या कार्यशाळेत मानव अधिकारांचे अभ्यासक डॉ. बळीराम कटारे, डॉ. पंडित नलावडे, डॉ. शोभा कारेकर आणि प्रा. अनिल मधाळे यांनी 120 विद्यार्थ्यांना दिवसभरात एक दिवसीय कार्यशाळेत चार सत्रात व्याख्याने दिली. राष्ट्रीय मानवी अधिकाराच्या हक्काच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या मानवी हक्क प्रशिक्षण व कार्यशाळेत यांनी मार्गदर्शन केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. दत्तात्रय वाबळे यांनी आयोजन केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दत्तात्रय कारंडे यांनी केले तर डॉ. पद्माकर गोरे यांनी आभार मानले.