पुणे -राज्यातील जिल्हा परिषदांच्या सर्व प्राथमिक शाळांमध्ये सर्वांसाठी शिक्षणाचे सूक्ष्म नियोजन करणे, विद्यार्थ्यांची सतत उपस्थिती टिकविणे व शिक्षणाचा दर्जा उचांवण्यासाठी 4 हजार 860 केंद्र प्रमुखांची पदे मंजूर करण्यात आली आहेत. यात 2 हजार 384 पदांची विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शिक्षकांच्या केंद्र प्रमुख पदावर नियुक्त्या करण्यात येणार असून यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी 6 ते 15 जून अशी मुदत देण्यात आलेली आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात ऑनलाईन पद्धतीने स्पर्धा परीक्षा घेण्यात येणार आहे.
मागील काही वर्षांपासून केंद्र प्रमुखांची बहुसंख्य पदे रिक्त पडलेली आहेत. अखेर प्राथमिक शिक्षकांच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेद्वारे ही पदे भरण्यासाठी हालचाली सुरू झालेल्या आहेत. केंद्र प्रमुखांची सद्यस्थितीतील रिक्त असलेले पदे, सेवानिवृत्ती, राजीनामा, बडतर्फी आदी कारणांनी रिक्त होणारी पदे भरण्यात येणार आहेत. यात 50 टक्के पदे पदोन्नतीने व 50 टक्के पदे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे त्या त्या कोट्याच्या मर्यादेत भरण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. यात प्रत्यक्षात 2 हजार 430 जागा उपलब्ध होण्याची गरज असताना सद्यस्थितीला 2 हजार 384 एवढ्या जागा उपलब्ध झालेल्या आहेत. या पदसंख्येत बदल होण्याचीही शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. परीक्षेचे माध्यम, अभ्यासक्रम, पात्रता, अर्ज करण्याची कार्यपद्धती व कालावधी याबाबतची माहिती अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी जारी केली आहे. परीक्षा परिषदेच्या ुुु.ीालशर्िीपश.ळप या संकेतस्थळावर सविस्तर अधिसूचना उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
राज्यातील एकूण 34 जिल्ह्यातील केंद्र प्रमुखांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 153 तर सर्वात कमी भंडारा जिल्ह्यात 30 जागांचा समावेश आहे. आयबीपीएस या कंपनीमार्फत जूनच्या शेवटच्या आठवड्यात 26, 27, 29 जून रोजी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा होणार आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या जवळच्या ठिकाणी परीक्षा केंद्राची व्यवस्था करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांनाच ही परीक्षा देता येणार आहे. अर्ज करण्यासाठी कमाल वयोमर्यादाही 50 वर्षे निश्चित करण्यात आलेली आहे. शिक्षकांना किमान तीन वर्षाच्या अनुभवाची अटही आहे.
जिल्हानिहाय केंद्र प्रमुखांची भरावयाची पदे
पुणे-153, अहमदनगर-123, सोलापूर-99, कोल्हापूर-85, सांगली-67, सातारा-111, रत्नागिरी-125, सिंधुदुर्ग- 61, नाशिक-122, नंदूरबार-33, धुळे-40, जळगाव-80, अमरावती-69, बुलढाणा-65, अकोला-42, वाशिम-35, यवतमाळ-90, नागपूर-68, वर्धा-43, भंडारा-30, गोंदिया-42, गडचिरोली-50, चंद्रपूर- 66, औरंगाबाद-64, हिंगोली-34, परभणी-43, जालना-53, बीड-78, लातूर-50, उस्मानाबाद-40, नांदेड-87, ठाणे-47, रायगड-114, पालघर-75.
मराठी व इंग्रजी माध्यमातून परीक्षा होणार
200 प्रश्नांची व 200 गुणांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नपत्रिका असेल
परीक्षेसाठी दोन तासांचा कालावधी
प्रत्येक जिल्हानिहाय स्वतंत्र गुणवत्ता यादी जाहीर होणार
पहिला पेपर बुद्धीमत्ता व अभियोग्यता घटकांवर असेल
दुसरा पेपर शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम, शैक्षणिक नवविचार प्रवाहांवर असेल