प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 15 -महाराष्ट्रात “खोके’ ही नवीन संज्ञा आली. आता देशभरात सगळीकडे खोक्यांची संस्कृती येऊ लागली आहे. केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी साधन, संपत्ती, सत्ता यांचा वापर करुन देशातील काही राज्यांमधील गट फोडून स्थिर सरकार पाडून ते अस्थिर करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. याचे उत्तम उदाहरण कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेश या राज्यात पहायला मिळाले आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रातील सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे.
शरद पवार यांनी विविध सामाजिक संस्था, संघटनांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी त्यांच्या बैठका घेतल्या. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यात विविध प्रश्नांवर त्यांनी भाष्य केले. महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारला दोन महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे. या सरकारच्या एकूण कारभाराकडे कसे पाहता, असा प्रश्न पवार यांना विचारण्यात आला. यावर कारभार काही दिसला नाही. राज्यप्रमुख गतीमान असून, राज्य समजून घेण्यासाठी फिरत आहेत. आपल्या गटातील आमदारांना संतुष्ठ ठेवण्याचाच त्यांचा अजेंडा आहे. यासाठी संबंधित आमदारांच्या मतदारसंघात दौरे काढले जात आहे, असे पवार यांनी सांगितले.
भाजपच्या “मिशन बारामती’ संदर्भात पवार म्हणाले, “”केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण बारामती दौऱ्यावर येणार आहेत. बारामतीत येणे हा त्यांचा अधिकार आहे. सगळ्या भागातल्या जनतेला त्यांचे विचार, भाषा सहजपणे समजेल, अशा शब्दात पवार यांनी टोचक टीका केली. राजकीय पक्षांना जागा जिंकण्यासाठी प्रयत्न करण्याचा अधिकार आहे. त्यांनी ते करावे. त्याबद्दल काही तक्रार नाही, असेही त्यांनी नमूद केले. बारामतीमध्ये येण्यासाठी नरेंद्र मोदी, प्रणव मुखर्जी यांना आमंत्रित केले होते. त्या स्तरावरच्या लोकांना मी आमंत्रित करतो. आता बाकीच्यांना कशाला मी आमंत्रित करू?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
सर्वोच्च न्यायालयाने 72 पेक्षा जास्त वय असलेल्यानी खेळांच्या संस्थेच्या पदावर राहू नये असा आदेश काढला आहे. त्यामुळे आता सगळ्या खेळाच्या संस्थांमधून सर्व पदावरुन राजीनामा दिला असल्याचेही पवार यांनी सांगितले. लम्पी रोगाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरणाची मोहीम युद्धपातळीवर राबविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. कॉंग्रेसच्या राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला तरुणांची चांगली साथ मिळत आहे. कोणत्याही नेतृत्वाबद्दल कसे बोलावे हे समजले पाहिजे. धोरणावर टीका करा पण नावांवरुन टीका करणे, बरे वाईट बोलणे योग्य नाही, असे पवार यांनी सांगितले.
विमानतळाचे त्यांनाच विचारावे
पुरंदर विमानतळाची जागा सतत बदलली जात असून, विमानतळ बारामतीला नेण्याच्या हालचाली सुरु आहेत. याबाबतच्या प्रश्नाला उत्तर देण्याचे शरद पवार यांनी टाळले.
शेतकऱ्यांना मदत मिळायला हवी
शेतीमालाला योग्य तो भाव मिळत नाही. योग्य प्रकारचा खर्च शेतीच्या उत्पादनातून मिळत नाही. घेतलेले कर्ज फिटत नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढू लागल्यात. केंद्र सरकारने तांदळाच्या निर्यातीवर 20 टक्के शुल्क लावून व बंदी घातल्याने शेतकऱ्यांना मिळणारे पैसे मिळणार नाहीत. कांद्याचे दरही खूप कमी झाले असून केंद्र शासनाने कांदा खरेदीचे धोरण अवलंबिले पाहिजे, असे पवार यांनी सांगितले.