पिंपरी – पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाबाबत मावळातील शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन राज्य सरकारशी चर्चा करुन तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू. तसेच सद्यसिस्थीत शहराला दररोज पाणी पुरवठा करण्यात येईल, अशी परिस्थिती नाही. मात्र, आंद्रा धरणातून ऑक्टोबर महिन्यात 100 एमएलडी पाणी आणण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पवना धरण 100 टक्के भरले असतानाही दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असल्याबाबत विचारले असता आयुक्त सिंह म्हणाले, मागील तीन वर्षांपासून दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. दिवसाआड पाणीपुरवठा होत असला तरी दैनंदिन पाण्यात कपात केली नाही. दिवसाला 510 एमएलडी पाणी दिले जाते. सद्यसिस्थीत शहराला दररोज पाणी पुरवठा करण्यात येईल, अशी परिस्थिती नाही.
आंद्रा धरणातून ऑक्टोबर महिन्यात 100 एमएलडी पाणी आणण्यात येणार आहे. तसेच भामा-आसखेड धरणातून पाणी आणण्यासाठी अडीच ते तीन वर्ष लागतील, असेही आयुक्त सिंह म्हणाले.
वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे पाणी कमी पडत आहे. त्यामुळे पवना धरणाव्यतिरिक्त शहरासाठी आंद्रा धरणातून 100 एमएलडी आणि भामा आसखेडमधून 167 एमएलडी असे 267 एमएलडी पाणी आणण्याचे नियोजन आहे.