पुणे – हैदराबादमधील तरुणीवर सामूहिक बलात्कार करुन तिला जाळण्याचे घृणास्पद कृत्य करणाऱ्या चारही आरोपींचा हैदराबाद पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे. त्यानंतर सर्वस्तरातून पोलिसांचे कौतुक केले जात आहे. परंतु याप्रकरणातील आरोपी हे खरे होते की नाही हे न्याय पद्धतीने सिद्ध झाले नसल्याने याबाबत शंकेला जागा निर्माण होते त्यामुळे प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, असे मत शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले होते.
‘या एन्काऊंटरमुळे पोलिसांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. खरा प्रश्न हा आहे की एन्काऊंटर झाला की घडविला गेला. आरोपी पोलिसांच्या ताब्यात असताना असा एन्काऊंटर होते त्यावेळी पोलिस यंत्रणेवर शंका येते. ज्यांनी वेळीच कारवाई केली नाही, तक्रार नोंदवून घेतली नाही अशा सगळ्यांवर कारवाई होऊ शकते. म्हणूनच यावर पडदा टाकण्यासाठी केलेला हा प्रयत्न असू शकतो. हे एन्काऊंटर केले कि घडवले याची केंद्राने चौकशी करायला हवी. जे घडलं त्यावर पडदा टाकण्यासाठी हे केलं गेलं आहे का?,’ असा सवाल विचारत त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे.
हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी पोलीस एन्काऊंटरमध्ये ठार झाले आहेत. घटनास्थळाची तपासणी करण्यासाठी त्यांना नेण्यात आले होते, तेव्हा पळून जाण्य़ाचा प्रयत्न करताना त्यांचा पोलिसांकडून खात्मा करण्यात आला आहे.