आजच्या सोशल मीडियाच्या काळात तारे-तारका टेक्नोसॅव्ही झाल्या आहेत. त्यांच्याकडे एक-दोन नाही तर चार-पाच सेलफोन असतात. त्यांचा कॉलिंग फोन आणि पर्सनल यूजचा फोन वेगळा असतो. असे असले तरी आपल्याला त्यांच्या जागी सचिवाचाच आवाज ऐकायला मिळतो. चित्रपट प्रदर्शनाच्या काळात माध्यमांना त्यांचा नंबर मिळतो खरा, मात्र त्यानंतर फोन नंबर हा अधिक बिझी होत राहतो आणि नंतर तो नॉट रिचेबल बनतो. आज सोशल मीडियाच्या माध्यमातून एका पोस्टने त्यांच्या चित्रपटाचे चांगल्या रितीने प्रमोशन होते. त्यामुळे कलाकारांचे प्राधान्यक्रम बदलले आहेत.
काही दिवसांपूर्वी अभिनेता जॉन अब्राहम याच्याशी एका पत्रकाराने बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र जॉन खूपच व्यग्र असल्याने मीडिया मॅनेजरच्या माध्यमातून संवाद साधण्याचा केलेला हा प्रयत्न अयशस्वी ठरला. त्यानंतर त्या पत्रकाराने एका युवा दिग्दर्शकाच्या मदतीने अभिनेत्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. हा दिग्दर्शक आपल्या नवीन प्रोजेक्टवरुन जॉनशी अनेकदा भेटला होता. त्याने जॉनचा थेट मोबाइल क्रमांक दिला. फावल्या वेळात चर्चा करण्याचा संदेश पाठवूनही जॉनकडून कोणताही प्रतिसाद आला नाही. यावेळी दिग्दर्शकाने आपले प्रश्न तयार ठेवण्याचा सल्ला त्या पत्रकाराला दिला. एकदा सकाळी एका वेळेत आपण त्यांना प्रश्न विचारु शकता, असे सांगण्यात आले. दुसऱ्या दिवशी ठरल्यानुसार घडले. जॉनने आरामात वेळ देत त्या पत्रकाराशी चर्चा केली. मात्र त्यानंतर पुन्हा फोन करण्याचा प्रयत्न केला असता फोनवरुन स्वीच ऑफचे संकेत मिळू लागले. प्रत्यक्षात बॉलीवूड तारकांचे सेलफोन नेटवर्क हे चाहत्यांपर्यंत पोचू शकत नाही, अगदी त्यांच्याप्रमाणेच. ते नेहमीच “नॉट रिचेबल’ राहतात.
बॉलीवूड नायक-नायिकांकडे एकच नाही तर अनेक सेलफोन ठेवणे ही नवीन गोष्ट नाही. साधारणपणे नायक-नायिकांकडे किमान तीन मोबाईल असतात. यापैकी एक ऑफिसचो, दुसरा त्यांच्या स्वीय सचिवाचा आणि तिसरा अत्यंत
महागडा असणारा फोन त्यांच्याजवळ असतो. हा फोन आपल्याला पार्टीदरम्यान किंवा कार्यक्रमात त्यांच्या हातात दिसतो. हा फोन तंत्रज्ञानाने अतिशय सुसज्ज असतो आणि त्यात असंख्य मेसेज आणि ऍप हे चांगल्या रितीने मॅनेज केलेले असतात. अतिमहत्त्वाचे कॉल किंवा मेसेजच त्यावर येण्याची सोय केलेली असते. यासंदर्भात बोमन इराणीने अतिशय मार्मिक उत्तर दिले आहे. ते म्हणतात, आमच्यापैकी प्रत्येक कलाकार हा चाहत्यांशी बोलू इच्छित असतो. मात्र दिवसभरात आम्हाला चाहत्यांचेच फोन येत असतात. अशा स्थितीत प्रत्येकाला उत्तर देणे कठिण असते. त्यामुळे आम्ही सचिव किंवा कार्यालयामार्फतच उत्तर देतो. जर मी कार्यालयात असेल तर एखाद्या-दुसऱ्या कॉलला उत्तर देतो. मात्र गरजवंतांना आम्ही स्वत:च बोलतो.
नवीन चित्रपट-नवा नंबर
बोमन इराणीसारखी संवेदनशीलता फार कमी कलाकारांत दिसून येते. एखादा नवीन चित्रपट रिलिज झाला की अनेक कलाकार आपला नंबर सार्वजनिक करतात. पत्रकारांना थेट प्रश्न विचारण्यासंदर्भात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी कलाकार काळजी घेतात. रिलिजच्या अगोदर कलाकार आणि चित्रपट चर्चेत येतात. मात्र कालांतराने चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या क्रमांकावर नंतर कोणीही भेटत नाही. प्रत्यक्षात हे नंबर चित्रपटाच्या प्रॉडक्शन हाऊसचे असतात. काही काळानंतर ते डिलिट होतात. एखाद्या मुलाखतीसाठी किंवा कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी कॉल केल्यास प्रॉडक्शनचा माणूस फोनवर बोलतो.
सारा आणि जान्हवीचा सरळपणा
नव्या पिढीतील सारा अली खान आणि जान्हवी कपूर या फोन उचलण्यात थोडीही दिरंगाई करत नाहीत. साराची ओळख ही चित्रपट उद्योगातील गुणी मुलगी म्हणून आहे. तिला लोकांशी बोलायला आवडते. मात्र चाहत्यांना तिचा नंबर मिळणे जरा कठीण जातो. कारण एका खास कोड क्रमांकासह तिने आपला नंबर काही विशेष लोकांनाच शेअर केला आहे. तिच्याकडे आणखी एक नंबर आहे आणि तो नंबर तिचा पीए उचलतो. काहीवेळा ती या नंबरवरही बोलते. दुसरीकडे आईच्या स्वभावाविरुद्ध असलेली जान्हवी कपूर ही चाहत्यांना थेट बोलण्यास प्राधान्य देते. देशात असो किंवा परदेशात असो, फोनची रिंग वाजताच नंबर न पाहता हॅलो म्हणून प्रतिसाद देते. या प्रकरणात ती वडिलांवर गेली आहे. बोनी कपूर देखील फोन उचलण्यात कोणत्याही प्रकारचे आढेवेढे घेत नाहीत.
नट्यांचे नखरे
इलियाना डिक्रुझचा फोन नंबर हा तिच्या खास मित्रांशिवाय अन्य कोणाकडे असेल, असे सांगणे कठीण आहे. प्रियंका चोप्राचे प्रकरण तर आणखी मजेशीर आहे. ती मुंबईत रस्त्यावर सर्वसाधारण नागरिकांप्रमाणे फिरल्याचे नाटक करते. अर्थात तिच्या भोवती सुरक्षा दलाचा गुप्त पहारा देखील असतो. मात्र फोन येताच ती सेलफोन दुसऱ्याकडे देते. दुसरीकडे माजी विश्वसुंदरी सुष्मिता सेनला कधीही फोन केला तरी झोपली असल्याचे सांगितले जाते. राणी मुखर्जी आणि अक्षयकुमार देखील आपल्याजवळ मोबाईल असल्याचे विसरूनच जातात. अक्कीच्या मोबाईलमध्ये त्याच्या भारी आवाजातील व्हॉइस मेसेज वाजतो आणि नंतर बोलतो असा संदेश दिला जातो. त्यानंतर त्याच्याकडून उत्तर मिळण्याची अपेक्षा ठेवणे म्हणजे मूखर्पणाच ठरेल. अतिशय कठिण प्रयत्नानंतर सोनाक्षी सिन्हाशी संपर्क झाल्यानंतर ती नंतर बोलते, असे सांगून फोन कट करते.
रणबीर कपूर का जबाब नही
रणबीर कपूरच्या अभिनयावरून चित्रपट उद्योगात कितीही चर्चा झाली तरी सेलफोन वापरावरून त्याला दहापैकी दोन गुण देण्यासही मागेपुढे पाहाल. कारण कपूर चिरंजिवाचा मूड अतिशय विचित्र आहे. जर मुड चांगला असेल तर तो वेळ देईल. जर मूड खराब असेल तर मुलाखत देण्याची आपली इच्छा नसल्याचे सांगेल. मला डिस्टर्ब करू नका, अशीही तंबी देईल. मोबाईलपासून दूर राहणाऱ्या तारकांत सर्वात आघाडीवर नाव फरहान अख्तरचे येते. वारंवार प्रयत्न केल्यानंतर आपण शाहरुख खान किंवा अमिताभला काही मिनिटासाठी बोलू शकता, मात्र बॉलीवूडच्या या जिनिअसला मोबाईलवर आणणे अतिशय कठीण काम आहे. फरहानने आपल्या पीआरओला कडक ताकीद देत आपला नंबर कोणालाही शेअर न करण्याचे निर्देश दिले आहेत. या आधारावर कतरिना कैफ आणि दीपिका पदुकोनचे प्रकरण वेगळे आहे. मॉडेलिंगच्या काळात या दोघीही सहजपणे फोनवर उपलब्ध असायच्या. आता मात्र त्यांचे नखरे वाढले आहेत. काही निवडक लोक वगळता ते अन्य मंडळींना नंबर शेअर करत नाहीत.
मेहरबान कधी होतात
काही निवडक लोक सोडले तर अन्य मंडळींना ही स्टार मंडळी कधीच फोनवर भेटत नाही. मात्र एका प्रकरणात स्टार आणि फॅन्समधील अंतर कमी होते आणि ते म्हणजे त्यांचा वाढदिवस. या विशेष दिवशी फोनवर मेसेज करुन ते आपल्या प्रश्नाला निश्चितच उत्तर देतात. या प्रकरणात बच्चन कुटुंबाचे उदाहरण दिले जाते. या दिवशी अमिताभ, जया, अभिषेक, ऐश्वर्या अतिशय विनम्रतेने सर्वांशी संवाद साधतात. शुभेच्छा दिल्यानंतर त्याला निश्चितपणे उत्तर मिळते, मग ते रिकॉर्ड केलेले का असेना.
हृतिकही बोलतो कधी कधी
एखाद्यावेळी आपल्याला नायक-नायिकेचा फोन नंबर मिळाला तर फार आनंदी होऊ नका. कारण त्यांना फोन केल्यानंतर आपल्या आनंदावर विरजन पडू शकते. मात्र यास काही अपवाद आहेत. हृतिक रोशन, शाहिद कपूर, सोनाक्षी सिन्हा यासारखे कलाकार हे फोन किंवा संदेशच्या माध्यमातून चाहत्यांच्या गळाला लागतात. आपण अधिक प्रयत्न केल्यास हृतिक रोशनचा आवाज फोनवर ऐकू शकता. मात्र तो नेहमीच फोनजवळ असतो, असे गृहित धरणे चुकीचे ठरेल. जर आपण योग्य रितीने त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला तर ते कदाचित आपल्या प्रश्नाला उत्तर देऊ शकतात.
चाहत्यांना शाहरुख निराश करतो
वास्तविक मोबाईल फोन वापरूनही ती गोष्ट निरर्थक असल्याचे 97 टक्के कलाकार मानतात. शाहरुख खान याचे उत्तम उदाहरण म्हणून सांगता येईल. त्याची जवळची मैत्रिण फराह खान देखील शाहरुख खानला मोबाईलवर पकडणे कठीण असल्याचे मान्य करते. रात्र सोडून द्या दिवसा देखील शाहरुख खानचा मोबाईल कोठेच दिसून येत नाही. जर पत्रकारांनी शाहरुख खानशी संपर्क करायचा ठरवला तर त्याच्या मध्यस्थापर्यंत पोचण्यासाठीच घशाला कोरड पडते. एवढा द्रविड प्राणायाम करूनही संपर्क झालाच तर त्या मोबाईलवर तिसराच सेक्रेटरी बोलत असल्याचे लक्षात येईल.
वास्तविक प्रत्यके वेळी तारकांना दोष देण्यात अर्थ नाही. चाहत्याच्या बळावर ते रातोरात स्टार होतात. त्याचबरोबर त्यांचे नखरेही चाहत्यांना सहन करावे लागतात. ते जर सहजासहजी उपलब्ध होऊ लागले तर त्यांना दररोज काम करणे कठिण होऊन बसेल. त्यामुळे मोबाईलपासून दूर राहण्याचे त्यांचे नखरे सहन करण्याची देखील सवय आपल्याला अंगिकारावी लागेल. प्रत्येक काम व्यवस्थित पार पाडण्यासाठी त्यांनी सचिव नेमला आहे. सचिव मंडळी हे तारकांचे काम सांभाळतात. तर आपल्या स्वप्नातील हिरो सहजपणे भेटला तर तो स्वप्नातील नायक कसा राहू शकतो, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो.
सोनम परब