राजगुरूनगर -खेड तालुक्यात करोनाचे संकट मोठे आहे. या काळात सार्वजनिक गणेश मंडळांकडून तसेच घरी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन खेडचे प्रांताधिकारी संजय तेली यांनी केले आहे.
गणेश उत्सव नियोजन बैठक शुक्रवारी (दि.14) खेड पंचायत समितीच्या सभागृहात झाली. त्यावेळी तेली बोलत होते. यावेळी पोलीस निरीक्षक सतीश गुरव, राजगुरूनगर नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रकाश पाटील, पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले, शिवसेना जिल्हा महिला संघटक विजया शिंदे, पंचायत समितीचे सभापती अंकुश राक्षे, माजी उपसभापती भगवान पोखरकर, सदस्य अमर कांबळे, पोलीस हवालदार संदीप भापकर, तालुक्यातील विविध गावातील मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.
संजय तेली म्हणाले की, गणेशोत्सव काळात गर्दी होते, त्यामुळे करोना संसर्ग फैलावण्याची भीती आहे. त्यामुळे शासनाने गणेश मंडळांना सर्व प्रकारच्या परवानग्या नाकारल्या आहेत. उल्लंघन करणाऱ्यांवर 188 नुसार कारवाई केली जाणार आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू आहे, त्याचे सर्वांनी पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
स्वराज्य गणेश मंडळाचे अध्यक्ष मच्छिंद्र राक्षे म्हणाले की, गणेश मंडळाची बरीचशी तयारी पुढे गेली आहे. प्रशासनाने भूमिका घेतली पाहिजे. सार्वजनिक उत्सव आहे. काही नियम आणि शर्ती पाळून मंडळांना परवानगी मिळावी. यासाठी कार्यकर्त्यांशी चर्चा करून सोमवारी बैठक घेऊन सर्वानुमते निर्णय घ्यावा, असे त्यांनी नमूद केले.
सार्वजनिक गणेश मंडळांनी हट्ट करू नये. यावर्षी शक्यतो सार्वजनिक गणेश उत्सव करणे टाळावे. कार्यकर्ते हे सर्व जबाबदार व्यक्ती असल्याने याबाबत जागरूक असावे.
– सतीश गुरव, निरीक्षक, खेड पोलीस ठाणे
यंदा गणपती मंडळांनी थांबावे. तालुक्यात त्यांनी एनजीओसारखी भूमिका घेऊन करोनाग्रस्तांना मदत करावी. सर्वांनी गणपती उत्सव घरातच साजरा करावा. श्री गणेश स्थापनेच्या अगोदर तीन ते चार दिवस शाडूंची मूर्ती घरी घेऊन जाव्यात, म्हणजे स्थापनेच्या दिवशी गर्दी होणार नाही.
– अंकुश राक्षे, सभापती, खेड पंचायत समिती