बारामती – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांची पक्षाविरोधात भूमिका घेतल्यामुळे कानउघडणी केल्यामुळे पवार कुटुंबात काही दिवसांपासून वादंग उठले होते. परंतु आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि नातू पार्थ पवार यांच्यातील वाद निवळला असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
काटेवाडी येथे (दि.15) पवार कुटुंबाची बैठक पार पडली. बैठकीमध्ये आजोबा-नातवाच्या वादंगावर अखेर पडदा पडला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांची फोनवरून चर्चा झाली आहे. वाद निवळल्यानंतर शरद पवार पुण्यातून मुंबईला रवाना झाले. त्यानंतर काटेवाडी (बारामती) हून अजित पवार हे पुण्याला रवाना झाले.
शनिवारी काका श्रीनिवास पवार यांच्या घरी पार्थ पोहोचले होते. अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांच्या बंगल्यात उशिरा रात्री ही बैठक झाली. यावेळी काका श्रीनिवास पवार यांनी पार्थ यांची समजूत काढली. यावेळी खुद्द अजित पवार उपस्थितीत होते.
अजितदादा, आई सुनेत्रा पवार, काकी शर्मिला पवार यांची संयुक्तिक चर्चा झाली आहे. पक्षाविरोधात भूमिका घेतल्यामुळे शरद पवार यांनी खडसावून सांगितल्यामुळे पार्थ यांची नाराजी दूर करण्यासाठी कुटुंबीयांनी त्यांची समजूत काढली.