नवी दिल्ली – लॉकडाऊनच्या काळात इयत्ता दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेच्या उत्तरपत्रिका शिक्षक आपल्या घरीच तपासणार असल्याचे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी काल जाहीर केले.
यासाठी केंद्रीय शिक्षण माध्यमिक मंडळानं नियोजित केलेल्या 3 हजार मूल्यांकन केंद्रातून उत्तरपत्रिका शिक्षकांच्या घरी पाठवल्या जातील. ही प्रक्रिया आजपासून सुरू होणार असून 50 दिवसांत पूर्ण करण्याचे ठरवण्यात आले आहे.
या तीन हजार मूल्यांकन केंद्रांना उत्तरपत्रिका तपासणी संबंधित काम करण्याची तसेच कंटेनमेंट झोनमधेही उत्तरपत्रिका तपासणीसाठी पाठविण्याची परवानगी गृहमंत्रालयाने दिली आहे. यापूर्वी घेण्यात आलेल्या दहावी, बारावी परीक्षेच्या 1.5 कोटी उत्तरपत्रिका शिक्षकांना दिल्या जातील, असेही मंत्र्यांनी सांगितले.