इम्फाळ – मणिपूर हिंसाचाराच्या चौकशीसाठी न्यायिक आयोग स्थापन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर हिंसाचाराच्या घटनांमागील कारणांची चौकशी केंद्रिय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआय करणार आहे, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली आहे.
दरम्यान, अमित शहा यांच्या दौऱ्यादरम्यान राज्यात पुन्हा हिंसाचार उसळला. कुकी अतिरेक्यांसोबत झालेल्या गोळीबारात तीन पोलीस गंभीर जखमी झाले. ही घटना बिष्णुपूर जिल्ह्यातील आहे. जखमींना इंफाळ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बुधवारी रात्री तांगजेंग भागातील खुंबी पोलिस स्टेशनमध्ये पोलिस आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार झाला. इम्फाळ पूर्वेकडील चानुंग भागातही जोरदार गोळीबार झाल्याची माहिती आहे. मात्र, यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
याआधी अमित शाह म्हणाले की, राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. यासोबतच लोकांचे त्यांच्या घरी सुरक्षित परतणे सुनिश्चित केले जाईल. यावेळी अमित शहा यांनी मदत छावण्यांमध्ये राहणाऱ्या मैती आणि कुकी जमातींच्या लोकांचीही भेट घेतली आणि त्यांना आश्वासन दिले की सरकार सर्वांना सुरक्षा प्रदान करण्यावर भर देत आहे जेणेकरून ते त्यांच्या घरी परत येतील.
मणिपूरमध्ये एक महिन्यापूर्वी आदिवासी एकता मार्चदरम्यान हिंसाचार झाला होता. वास्तविक मेईतेयी समाजातील लोक आदिवासी आरक्षणाची मागणी करत आहेत. याविरोधात मणिपूरच्या डोंगराळ भागात आदिवासींच्या मोर्चादरम्यान हिंसाचार उसळला होता. या हिंसाचारात आतापर्यंत जवळपास 80 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक दहशतवादी संघटना आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाल्याचे वृत्त आहे. लष्कर आणि पोलिसांकडून ठिकठिकाणी शोधमोहीम राबवली जात असून ड्रोनद्वारेही पाळत ठेवली जात आहे.
मणिपूर दौऱ्यात अमित शाह यांनी केवळ पोलीस प्रशासन आणि लष्कराच्या अधिकाऱ्यांशीच चर्चा केली नाही, तर विविध नागरी संघटनांच्या प्रतिनिधींशीही चर्चा केली आणि शांतता प्रस्थापित करण्याच्या उपाययोजनांबाबत चर्चा केली. मणिपूरमधील चुराचंदपूर जिल्हा हिंसाचाराने सर्वाधिक प्रभावित झाला आहे. कुकी जमातीच्या अनेक दहशतवादी संघटना येथे सक्रिय आहेत.