मुंबई – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हत्या प्रकरणांचा तपास नव्याने सुरू करण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या कथित सहभागाच्या संशयावरून ही प्रकरणे नव्याने तपासली जावीत, अशी मागणी राज्याच्या गृहमंत्र्यांकडे केली जाणार आहे, असे शिवसेनेचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील खासदार आणि पक्षाचे प्रवक्ते विनायक राउत यांनी ही माहिती दिली. सिंधुदुर्गमधील हत्या आणि खंडणीच्या गुन्ह्यामध्ये कोण सहभागी आहे, हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे, असे राउत पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले.
नारायण राणेंनी शिवसेनेवर भ्रष्टाचार आणि हत्येचे आरोप करणे म्हणजे थट्टा आहे. त्यांना त्यांचा स्वतःचा इतिहास माहित नाही का? असा प्रश्न राउत यांनी विचारला. गेल्या 9 वर्षात सिंधुदुर्गामध्ये 7 राजकीय हत्या झाल्या आहेत. ही प्रकरणे पुन्हा खुली करण्यात यावीत, असे आम्ही राज्याच्या गृहमंत्र्यांना सांगणार आहोत, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या “मातोश्री’तील चौघांविरोधात ईडीची नोटीस तयार असल्याचे राणे म्हणाले होते.
जुहू येथील नारायण राणेंच्या बंगल्याला मुंबई महापालिकेने नोटीस बजावली होती. त्यानंतर राणेंनी “मातोश्री’ संदर्भातील ट्विट केले होते. त्या ट्विटला राउत यांनी आज हे प्रत्युत्तर दिले आहे.
नारायण राणे कॉंग्रेसमध्ये असताना राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांचा
राणेंच्या विरोधात बोलतानाचा एक व्हिडीओ राउत यांनी या पत्रकार परिषदेत दाखवला.