बेल्हे – करोना आणि लॉकडाऊन याचा सर्वक्षेत्रांना जबर फटका बसला आहे. तर अस्मानी, सुलतानी संकटांचा दरवर्षी नेटाने सामना करणाऱ्या बळीराजाचे करोनामुळे आर्थिक कंबरडेच मोडले आहे. जुन्नर तालुक्यातील सीताफळ उत्पदकांना हक्काचे दोन पैसे जादा मिळवून देण्याचा हा हंगम. याच हंगामात करोना आणि लॉकडाऊनचे ग्रहण लागल्याने गेल्या वर्षीपेक्षा यंदा जवळपास सहा कोटींचे सीताफळ करोनाने गिळंकृत केल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
जुन्नर तालुक्यातील 800 हेक्टर क्षेत्रात शेतकऱ्यांनी सीताफळ बागांची लागवड केली आहे. त्यापैकी 500 हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे. तालुक्यातील शेतकरी अत्याधुनिक पद्धतीने फळबाग पिकवतात त्यामुळे यावर्षी पीक चांगले आले आहे. पुरंदर, बाळानगर, गोल्डन या जातीच्या फळबागा मोठ्या प्रमाणात आहेत तर बाळा नगर वाणाच्या तालुक्यात 65 टक्के फळबागा असून यंदा लॉकडाऊन व करोनामुळे मागणी व बाजारभाव नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी सतीश शिरसाठ यांनी दिली.
यंदा गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून शेतकरी करोनामुळे अक्षरश: मेटाकुटीला आला आहे. शेतकऱ्यांच्या सर्वच पिकांवर करोनाचा परिणाम दिसून आला. आता विशेष करून सीताफळाचा हंगाम असून देखील सीताफळांना भाव नाहीत. शेतकरी उत्पादक वर्ग, व्यापारी वर्ग यांच्यात नाराजीचा सूर आहे. सीताफळ नाशवंत घटक आहे. त्याची मोठ्या प्रमाणात निर्यात देखील केली जाते. या सर्व चक्रावर करोनाचा जबर परिणाम झाला आहे.
ना नफा ना तोटा तत्वावर विक्री
सीताफळामुळे सर्दीला ही निमंत्रण दिले जाते. म्हणून विशेष सीताफळाचा आस्वाद घेण्यासाठी खवय्यांनी देखील तुर्तास स्थगिती दिली आहे. त्यामुळे यावर्षी सीताफळ उत्पादनावर उत्पादक, व्यापारी वर्ग यांच्यावर मोठे संकट कोसळले असून नफा ना तोटा तत्वाला स्वीकारून या परिस्थितीतून सावरण्याचा प्रयत्न करीत आहेत.
एकरातून मिळायचे 1 लाख
सीताफळाची गतवर्षी दर चांगला असल्याने एकरात अंदाजे 1 लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पादन मिळत होते. यावर्षी करोनामुळे सीताफळाचे 50 टक्के दर कमी झाले आहेत. 500 हेक्टर क्षेत्रातील सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांना यंदा गतवर्षीच्या तुलनेत सुमारे 6 कोटी रुपयांचा फटका बसणार आहे.
लॉकडाऊनमुळे सीताफळाची विक्री करण्यास अडचण येते. व्यापारी यावर्षी सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांकडे फिरकत सुद्धा नाहीत. सीताफळाची विक्री कुठे करायची हा प्रश्न पडला आहे. गेल्यावर्षी माझ्या बागेत साडेतीन एकरमध्ये साडेचार लाख रुपये उत्पादन निघाले होते. गतवर्षी पेक्षा या वर्षी निम्याने दर कोसळले आहेत. त्यामुळे सीताफळ उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे
– बाबुराव देवकर,
सीताफळ उत्पादक शेतकरी, आळेफाटा