पुणे – खडकी आणि पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे (पीसीबी) पुणे महानगरपालिकेत (पीएमसी) विलीनीकरण अजूनही चर्चेतच रखडले आहे. याबाबत प्रशासकीय ताळमेळ नसल्याने प्रक्रिया रखडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. दरम्यान, आता संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे या प्रश्नी बैठक घेणार असल्याची चर्चा आहे.
राजनाथसिंह हे काही दिवसांपूर्वी पुणे दौऱ्यावर होते. त्यावेळी पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड मतदारसंघाचे आमदार सुनील कांबळे यांनी निवेदन देत स्थानिक समस्या मांडल्या आहेत. दरम्यान, पुढील 15 दिवसांत ही बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन सिंह यांनी दिल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, पुण्यातील लोकप्रतिनिधी, खडकी आणि पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डांचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि पुणे मनपा आयुक्त या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, पालिकेत विलीन होण्याच्या निर्णयाबाबत कॅन्टोन्मेंटचे रहिवासी आतुरतेने वाट पाहत आहेत.
निधी पूर्णपणे बंद
एकीकडे 2017 पासून केंद्राकडून निधी मिळत नसल्यामुळे कॅन्टोन्मेंट रहिवासी त्रस्त आहेत. तर दुसरीकडे विलीनीकरणाच्या विषयावरील प्रशासकीय कासवगती कारभाराचा परिसरातील रहिवाशांना मोठा फटका बसत आहे. केंद्र सरकारच्या अनिर्णयतेमुळे कॅन्टोन्मेंट परिसरांतील रहिवासी त्रस्त आहेत.
मसुदा तयार
पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी पुणे मनपा कार्यालयास भेट दिली होती. यावेळी त्यांनी सुमारे 4 तास जुनी कागदपत्रे, अहवालांचा अभ्यास केला. त्यानंतर मनपा अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची निकड ओळखून विलीनीकरणासंबंधीचा मसुदा तयार करून तो महापालिका आयुक्तांच्या कार्यालयात स्वाक्षरीसाठी सादर केला.