नगर – महापालिकेच्यावतीने शहरातील जुने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, पोस्ट ऑफिस तसेच शासकीय विश्रामगृह रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा ठरत असलेले बंद पडलेले चारचाकी वाहने, व भंगार वाहन महापालिकेच्यावतीने हटविण्यात आले. शनिवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली.
मनपाचा अतिक्रमण विरोधी पथक, प्रभाग समिती तीन व आरोग्य विभागाच्या वतीने ही संयुक्त मोहीम राबविण्यात आली. यावेळी आयुक्त डॉ. पंकज जावळे उपस्थित होते. शहरातील विविध रस्त्यांवर बंद अवस्थेतील वाहने येत्या दोन दिवसांत संबंधित मालकाने हटवावेत, अन्यथा महापालिकेच्या वतीने सदर वहाने जमा करून घेण्यात येतील व दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
तसेच शहरातील विविध चौक, रस्त्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांनी कचरा टाकण्यासाठी डस्टबीनचा वापर करून ओला व सुका कचरा वेगळा करावा, सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर कचरा टाकू नये, अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त जावळे यांनी दिला. या कारवाई प्रसंगी घनकचरा विभाग प्रमुख अशोक साबळे, अतिक्रमण विभागाचे क्षेत्रीय अधिकारी रिजवान शेख, देविदास बिज्जा, स्वछता निरीक्षक तुकाराम भांगरे, राजेश तावरे, बाळासाहेब विधाते, प्रसाद उमाप, संदीप चव्हाण, प्रशांत रामदिन आदी उपस्थित होते.