विद्यार्थी, कामगार अद्यापही गावीच
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील कामगारांच्या स्वस्त जेवणाचा आधार असलेल्या खानावळींचे अर्थचक्र लॉकडाऊन संपुष्टात आल्यानंतरही अजूनही संकटात आहे. करोना संसर्गामुळे बहुतांश परप्रांतीय कामगार आणि विद्यार्थी आपल्या राज्यात निघून गेले. करोना संकट ओसरल्यावरही कामगार अजून परतले नाहीत. तसेच महाविद्यालयही सुरू झालेली नाहीत. त्यामुळे आता जागेचे भाडे, विद्युत बिल कसे भरायचे, असा प्रश्न या खानावळ चालकांपुढे निर्माण झाला आहे.
पिंपरी चिंचवड शहर उद्योग नगरी, शिक्षणाचे माहेरघर, कामगार नगरी म्हणून ओळखले जाते. येथील बांधकाम व्यवसाय, लघु उद्योग, आयटी क्षेत्र आणि शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना आपल्या दोन वेळच्या जेवणासाठी खानावळीवर अवलंबून राहावे लागते. यामुळे ठिकठिकाणच्या घरांतून खानावळीचा व्यवसाय सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि कामगारांच्या जेवणाची सोय तर होतेच, शिवाय खानावळी चालकांनाही पैसे मिळतात. मात्र करोनामुळे कामगार निघून गेले. शैक्षणिक संस्था बंद असल्याने विद्यार्थी गावी गेले आहेत.
शहरातील संत तुकाराम नगर-पिंपरी, आकुर्डी, ताथवडे, चिखली, थेरगाव, काळेवाडी या भागात मोठ्या प्रमाणात खानावळी चालतात. सुरुवातीला करोना संसर्ग सर्वच भागात मोठ्या प्रमाणात होता. त्यामुळे लाखो कामगार आणि विद्यार्थी आपल्या राज्यात निघून गेले. खानावळीत काम करणारे कामगारही गावी गेल्यामुळे अनेक खानावळ मालकांनाही गावचा रस्ता धरावा लागला आहे.
खानावळ चालकांचे घरभाडे, वीजबिल थकले आहे. महेश दुबे हे गेल्या 11 वर्षांपासून चिखलीत खानावळ चालवत आहेत. लॉकडाऊनपूर्वी त्यांच्या खानावळीत दिवसाला 75 कामगार जेवायला येत होते. ग्राहक नसल्यामुळे खानावळ चालवणे कठीण झाले, असे त्यांनी दै. “प्रभात’शी बोलताना सांगितले.
“मी व माझे सर्व कुटुंब मिळून गेल्या 10 वर्षांपासून खानावळ चालवत आहोत. स्वस्त आणि दर्जेदार जेवण देत असल्याने अनेक कामगार आमच्याकडे जेवायला येत होते. गेल्या आठ महिन्यांपासून खानावळ बंद होती. आता हळूहळू खानावळ सुरू करण्याचा प्रयत्न करत आहे.”
– मीनाक्षी मोरे, थेरगाव