Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंची सिंधुदूर्ग जिल्ह्यात सभा पार पडली होती. या सभेत भास्कर जाधव यांनी राणे कुटुंबावर जहरी टीका केली होती. निलेश राणे यांनी भास्कर जाधव यांच्या टीकेला उत्तर देत आव्हानही दिले होते. गुहागरमध्ये येऊन मी जशास तसं उत्तर देईन असा इशारा त्यांनी दिला होता.
त्यानुसार निलेश राणे यांची गुहागरच्या तळी येथे सायंकाळी जाहीर सभा होणार होती. या सभेला विरोध करण्यासाठी भास्कर जाधव यांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. दरम्यान, दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर दगडफेक केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“असे भ्याड हल्ले करून कोणीच कुणाला थांबवू शकत नाहीत. ज्या प्रकारची राजकीय संस्कृती आणण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात होत आहे, निश्चितपणे याची निराशा ही त्यातुन पाहायला मिळत आहे. जी घटना घडली आहे त्यात योग्य कारवाई करू,” असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
नेमकं काय घडलं?
भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांची गुहागरमध्ये सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र राणे यांच्या या सभेला भास्कर जाधव आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून विरोध केला जात आहे. भास्कर जाधव यांचे कार्यालय मुंबई-गोवा मार्गावर होते. त्यामुळे राणे यांच्या ताफ्यातील कार भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोर उभ्या केल्यानंतर भास्कर जाधव आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. या वादानंतर निलेश राणे यांचे आगमन झाले. त्यानंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी निलेश राणे यांच्या ताफ्यावरील कारवर दगडफेक केली. निलेश राणेंच्या या सभेपूर्वीच वातावरण तापल्याचे पाहायला मिळाले होते.