पुसेगाव (प्रतिनिधी) – खटाव तालुक्यातील भुरकवडी ग्रामपंचायतीची निवडणूक ग्रामस्थांनी सलग सहाव्यांदा बिनविरोध केली आहे. एकीच्या जोरावर षटकार मारून “महिलाराज’ राबवण्याचा प्रयोग पुन्हा यशस्वी केल्याबद्दल ग्रामस्थांचे कौतुक होत आहे. या गावाने राज्यात आदर्श निर्माण केला आहे.
शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी महाराष्ट्रात पहिले महिला धोरण आणत त्यांना 33 टक्के आरक्षण दिले. त्यांच्या विचारांवर चालताना भुरकवडी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत सदस्य म्हणून ललिता कदम, मनीषा कदम, शीतल कदम, रेश्मा कदम, रंजना कदम, सुजाता गाढवे, सुलोचना कुंभार यांची निवड केली आहे. गावात सोसायटीवर सुशीला कदम व सुलोचना पवार संचालिका आहेत
तर ग्रामसेविका धनश्री गमरे, आरोग्यसेविका जंगम, प्राथमिक शाळेच्या दोन शिक्षिका, अंगणवाडी सेविका शुभांगी कदम, मनीषा चव्हाण, मदतनीस सुमन कदम, रंजना कुंभार, आशा स्वयंसेविका रेश्मा फडतरे, सीमा जाधव काम पहात आहेत.
दिवंगत गणपतराव कदम (आबा) व रामभाऊ पाटील यांच्या संकल्पनेतून 1995 सालापासून ग्रामपंचायत निवडणुक बिनविरोध करण्यात येत आहे. यंदा ग्रामपंचायत सदस्यपदी महिलांना संधी देण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.