नवी दिल्ली – देशातील लोकसभेच्या 4 जागा सध्या रिक्त आहेत. मात्र, त्या मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका होण्याची शक्यता नसल्याचे संकेत सोमवारी सुत्रांनी दिले. लोकसभेच्या रिक्त जागांमध्ये पुणे आणि चंद्रपूर या महाराष्ट्रातील 2 मतदारसंघांचाही समावेश आहे.
पुणे, चंद्रपूर आणि हरियाणातील अंबाला या लोकसभा मतदारसंघांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खासदारांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले. तर, उत्तरप्रदेशच्या गाझीपूरचे बसप खासदार अफजल अन्सारी यांना अपात्र ठरवण्यात आले. संबंधित मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका केव्हा होणार याबाबत मोठी उत्सुकता होती.
पण, त्या होण्याची शक्यता धूसर बनली आहे. निवडणूक कायद्यानुसार एखादी जागा रिक्त झाल्यापासून 6 महिन्यांत पोटनिवडणूक घ्यावी लागते. पण, निवडणूक आयोग विशिष्ट तथ्यांच्या आधारे पोटनिवडणूक न घेण्याचा किंवा ती पुढे ढकलण्याचा निर्णय घेऊ शकते. अर्थात, त्यासाठी निवडणूक आयोगाशी केंद्रीय कायदा मंत्रालयाचा कायदेविषयक विभाग सहमत असावा, अशी वैधानिक तरतूद आहे.
सध्या रिक्त असणाऱ्या लोकसभेच्या जागांबाबत निवडणूक आयोग आणि कायदेविषयक विभाग संपर्कात आहे. तिथे पोटनिवडणुका घेतल्यास नवनिर्वाचित खासदारांना लोकप्रतिनिधी म्हणून अतिशय कमी कार्यकाळ लाभेल, असा त्यांच्यातील चर्चेचा सूर असल्याची माहिती सुत्रांनी दिली. पुढील लोकसभा निवडणूक अवघ्या 7 महिन्यांवर येऊन ठेपली आहे. ती बाब विचारात घेतली जात असल्याचे समजते.